भारतीय जनता आता लोकसंख्येचा स्फ़ोटा पाशी येऊन ठेपली आहे असे ऐकत होतो पण आता त्यावर विश्वास बसायला लागला आहे. माझा जन्म भारतातला आहे गेल्या पन्नास वर्षात बरीच स्थित्यतर मी अनुभवलि, बघितली आहेत पण आज मितीला मला जाणीव होतेय ती भारतीय जनतेच्या लोकसंख्येची. त्याला कारण ही तसेच आहे. आज तुम्ही जाल तिकडे लोक आहेत. इतकी आहेत की एकमेकांना धडकून पुढे जावे लागते की काय इतपत...मी गेल्या विस वर्षांपासून प्रवास करतोय त्यात मी सगळी साधन वापरून प्रवास केला आहे. पण मुख्य त्वे रेल्वे ने जास्त प्रवास मी केला जो की हर एक भारतीय रोजच अनुभवतो पण आज हा परी छेद लिहावासा वाटला कारण मी आज पुण्याहून रांची कडे जात आहे साधारण 30 तासाचा हा प्रवास सुपरफास्ट म्हणवल्या जाणाऱ्या गाडीतून करतोय पण जे काही आजूबाजूला पाहतोय ते बघून आता रेल्वे प्रवास किमान लांबचा टाळणे इष्ट होईल असे वाटायला लागले आहे. मित्रानो मी 3 ऐसी चे तिकीट बुक केले जेणेकरून प्रवास सुखकर होईल ही माफक अपेक्षा पण कसचं काय अन कसचं काय...काल निघाल्या पासून अडचण आणि आतर्किक घटनाची माळ च जणू चालू आहे..काल निघताना लोकांकडे बॅग्स होत्याच पण त्यात ही रंगाच प्लास्टिक बाद्ल्या आणि पिंप घेऊन लोक प्रवासाला निघालेली मी पहिल्यांदा बघत होतो की जे एखाद्या भांगरांत मिळेल ते घेऊंन प्रवास करायचे प्रयोजन काय हेच मला नाही समजले. सीट कन्फर्म झाले असे म्हणे पर्यंत माझ्याच नंबरवर अजून एक महाशय रेल्वे ने बसवले आहेत हे मला पहिल्यांदा कळले. एकच सीट दोघांना वाटून हे बघून तर मी चक्रवलोच.. आज पर्यंत असे कधी झालेले मी पाहिले नाही.प्रवास सुरु व्हायलाच गाडी 4 तास लेट निघाली म्हणजे ती आता पोहोचताना पण साहजिकच लेट होणार.. बर एसी बोगीचे बुकिंग आहे..तिकीट सामन्यापेक्षा महाग आहे तर गर्दी पण कमी असेल ही अपेक्षा फेल ठरली. इतकी गर्दी आणि नको तेवढे सामान घेऊन लोक चढली आहेत की काही सांगता सोय नाही. मागच्या वेळच्या प्रवासात मी गमतीने म्हणालो होतो आता स्लीपर क्लास नाही फक्त एसी किंवा विमान..पण आज तिच वेळ पुन्हा आलीये..आता एसी पण नको फक्त विमान...लांबच्या प्रवासाला विमानाने जाणे कधीही आपल्याला सोयीचे आहे. इतकी माणसांची गर्दी वाढली आहे की विचारता सोय नाही. अजून 10 वर्षानी काय होणार आहे काही सांगू शकत नाही...कदाचित विमानात पण स्टँडिग सुरु होईल असे वाटतेय.एक विदारक अनुभव घेत मी सुपरफास्ट म्हणवणाऱ्या ट्रेन मधून बैलगाडी च्या वेगाने जातो आहे. आणि गमन्ट म्हणजे तिकीट चेकर पण इतके निर्विकार फिरत आहेत की जसे आम्ही त्या गावचे नाहीच मुळी... अजब गजब कारभार आहे. थोडक्यात काय तर माणसांच्या भाऊ गर्दी मध्ये आपला आनंद हरवताना दिसतो आहे। तसेच आपण मनात ठरवतो एक आणि घडतेय भलतेच असा ही अनुभव येतो आहे. मी तरी लांबच्या प्रवासाला उंची ट्रेन किंवा महाग तिकीट असेल तर जाईन नाहीतर विमान आहेच... तुमचे काय?
Monday, May 5, 2025
Tuesday, December 22, 2020
एक सकाळ अशीही
आताशा मी तसा रोजच सकाळी फिरायला जायचा चंगच बांधलाय गेले महिना भर तरी मी रोज सकाळी उठून नित्यनेमाने बाहेर फिरावयास जातोच जातो. कानात रेडिओ त्यात विविध भारती ची जुनी गाणी हा आता रोजचा शिरस्ता झालाय. त्यात एक अजून दागिना आपल्या सर्व लोकांच्या नाकाला लागलाय आणि तो म्हणजे मास्क,ज्या पासून पुढील सहा महिने तरी सुटका नाहीये असे ऎकीवात येतेय असो. घराबाहेर पडल्यावर मी तसा नाका समोर चालायला सुरवात करतो. सातारा रोड सकाळी पार करणे हे देखील दिव्य आहे. वाहनाचा राबता आता बराच वाढलाय पूर्वी पुण्यात असला काही नव्हतं एखाद गाडी आलीतर यायची नाहीतर सगळीकडे सामसूम असायची. चालायला सुरवात झाल्यावर गाणी ऐकता ऐकता मी काही निरीक्षण करत असतोच. जसे कि आपल्याला तेच तेच लोक तेच तेच कपडे घालून भल्या सकाळी दिसतात.काही लोक भाजी घेऊन विकायला बसलेली असतात काही लोक तीच भाजी घेऊन ऑफिसला डबा घेऊन जायच्या तयारीने येतात. रस्त्याच्या कडेला एखादा भिकारी कुडकुडत झोपलेला आढळतोच.काही लोकांचा चालण्याचा वेग हा जास्त असतो काही लोकांचा रमत गमत चालण्याचा मूड असतो. सूर्यनारायण जेव्हा दर्शन देतात तेव्हा काही मंडळी हटकून फुटपाथ वर थांबून त्याचे दर्शन घेतात. नाही म्हणायला काही लोक शेकोटी करून कोंडाळे करून गप्पाचा डाव मांडून बसलेली असतात. सकाळी अजून एक हटकून दिसणारे दृश्य म्हणजे रस्त्यावरील भटकी कुत्री... रात्र सरलेली असते ह्यांना भूक हि लागलेली असते मग काही लोक त्यांना खायला खाऊ आणून देतात तर काही लोक त्यांना प्रेमाने जवळ घेताना हि दिसतात. रस्त्यावर गर्दी कमी असते म्हणून असेन किंवा सकाळी घाईची वेळ असेन म्हणून असेन दोन चाकी वाहनाचा वेग हा विलक्षण असतो आणि धडकी भरवणारे आवाज करत हि सुसाट वेगात जात असतात. मनपाचे कर्मचारी देखील सकाळी साफ सफाई च्या कामात गुंतलेले असतात. त्यांना त्रास द्यायला डुकराच्या झुंडी कचरा चिवडून रस्त्यावर आणायची कामे इमाने इतबारे करताना मला रोज आढळतात.सध्या सकाळी थंडी गुलाबी असल्या कारणाने आसमंत सगळं धुक्याची दुलई पांघरून असतो. रोजच्या प्रमाणे मी आजही मी बाहेर पडलो होतो साधारण ४ किमी चा माझा रोजचा वॉक असतोच. आज सकाळी जरा नवल घडले. मी सहसा अनोळखी लोकांना कधी ओळख दाखवत नाही पण सोसायटी मध्ये आत येताना महानगर पालिकेचा एक कर्मचारी रास्ता झाडात असताना मला अनाहूतपणे गुड मॉर्निंग म्हणाला मी देखील त्याला सहज विश करत पुढे आलो पण अशिक्षित आणि रास्ता झाडणाऱ्या एक सफाई कर्मचाऱ्याने मला सकाळी सकाळी दिलेला हा सुखद धक्का होता... माझी सकाळ तर तशी तरोताजा सुरु झाली पण त्यालाही मला विश करावेसे वाटले हे पाहून मनोमन सुखावलो आणि घराकडे झपझप चालू लागलो.
Monday, October 19, 2020
मी ..विचार आणि फुले...
पावसाळ्या नंतर महाराष्ट्रातल्या डोंगरावर जणू फुलाची आरास फुलते आणि मग सुरु होतो रंगाचा खेळ. निसर्ग मुक्त हस्ते आपल्या दोन्ही हाताने हिरवाई वर जणू फुलांचा बगीचा फुलवतो त्याला मग नसते कसले बंधन कि आडकाठी आपण फक्त आणि फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा आणि मनोमन धुंद फुंद होऊन जायचे. खूप दिवसापासून माझा कॅमेरा अडगळीतून मी बाहेर काढला आणि चालू पडलो ह्या निसर्गाच्या नवलाईचा सोहळा बघायला नवरात्री चा आरंभ ते दिवाळी पर्यंत हा सोहळा आपण अनुभवू शकतो ह्याला कोठेही जंगलात जायची गरज लागत नाही कि कुठेही शहरापासून लांब .....
मी मनोमन कॉसमॉस फुलाचे फोटो काढूयात हि इच्छा ठेऊन बाहेर पडलो तशी डोंगर हा पुणेकरांसाठी काही नवीन नाही पुणे शहर हेच डोंगराच्या कुशीत वसले असले कारणाने चहूबाजूला कुठेही जाऊन आपण त्याचा स्वाद घेऊ शकतो. ठरल्या वेळेनुसार मी तळजाई च्या पठारावर पोचता झालो कॅमेरा गळ्यात लटकावून सगळी आयुध मी सरसावून फोटोग्राफी ला सुरवात केली पण मनासारखा लाईट काही मिळत नव्हता नुकताच शहराला माघारी फिरणाऱ्या मान्सून चा फटका बसला असलेने ढगांची तुरळक उपस्थिती होतीच त्यामुळे सकाळची कोवळी किरण काही अजून जमिनीवर पडली नव्हती.एव्हाना माझ्यातला फोटोग्राफर जागृत झाला होता. रोज फिरायला जायची सवय असल्या कारणाने मी तशी तंग पॅन्ट अर्थात बर्मुडा घालून बाहेर पडलो होतो. जामानिमा सगळा असला तरीही सह्याद्री मध्ये काळानुसार आणि ऋतूनुसार कीटकांची उपस्तीथी असते ह्याचे भान विसरायला झाले होते. मी मुख्य रस्त्यावर थोडासा आत जायचा प्रयत्न करत होतो जेणेकरून मला शांततेने माझ्या फोटोग्राफीचा आनंद लूटता यावा. एव्हाना रस्त्यावर हौसे नवसे गवसे असे सगळी मंडळी व्यायाम कमी पण गप्पाष्टकामधे रमत मार्गक्रमणा करत होती. माझे लक्ष हे फक्त फुल आणि कोवळी उन्हे ह्याचा शोध घेत होती आणि अखेर ती वेळ आली सूर्यकांत तळपदे अर्थात सूर्यनारायणाने दर्शन दिले आणि मी सरसावून माझ्या छंदाला क्लिक क्लिकाटाची जोड देत अजून काही चांगले फोटो येतात का हे पहात होतो अजून अजून करत मी तसा चांगलाच आत आलो होतो सुरवातीला असणारा माझा उत्साह आता मावळतीकडे निघाला होता त्याला कारण हि तसेच होते. माझ्या पायाला गवतांमधील कीटक चावायला सुरवात झाली होती आणि चांगलेच लाल लाल झाले होते. हे सगळं करत असताना मला आताशा जाणीव व्हायला लागली होती कि माझा हात थरथर कापतोय आणि इतक्या वर्षाची माझी थोर तपस्या माझ्या आळसाने धुळीस मिळवली आहे. कारण फोटोग्राफी हा छंद फक्त आणि फक्त तुमच्या कौशल्यावर आधारित आहे एकदा का कॅमेराचा आणि तुमचा संबंध सुटला कि तुमचा हात थरथरला... तेच माझेही व्हायला लागले होते. मी अजून काही मनातले जे फोटो हवे तसे काढायचा प्रयत्न केला पण मना जोगते फोटो मी काही काढू शकलो नाही आणि झरझर पावले टाकत मी मुख्य रस्त्याला आलो जेणेकरून मी कीटक पासून सुटका करून घेऊ शकेन. अर्थातच माझा फोटोग्राफीचा बेत पूर्णत्वास गेला नाहीच. मी हिरमुसल्या मनाने बाहेर पडलो ते पुढच्या वेळेस नक्कीच चांगले फोटो काढीन ह्या इराद्याने...
Saturday, March 11, 2017
अनुभवासाठी दाहिदिशा
दिवेलागण झालेली... संध्याकाळ आताशा रात्री कडे झुकलेली... मी रोज सारखाच दुकानात बसून काही कामाचा निपटारा करण्यात मग्न... अचानक एक तरूण दुकानात शिरला. दाढी वाढलेली.. थोडे तर्राट वाटणारे डोळे... अंगावर नेहमी प्रमाणे डगलं चढवलेली... कपडे बहुधा दिवसांच्या अंतराने धुवत असावा...आत येण्याची परवानगी घेऊन माझ्यासमोर बसला. नजर भिरभिरती असल्याने मला अंदाज आला की हे गिर्हाईक नाहीये. मी विचारपूस केली पण तसे त्याचे नियोजन नव्हते. एक दोन मिनिटाच्या अंतराने त्याने मला नोकरी द्याल का असे विचारले. हा प्रश्न माझ्या करीता जरा वेगळा असल्याने क्षणभर गोंधळ उडाला.
पण सावरतच मी त्याला त्याची माहिती विचारली. हिंगणघाट चा राहणारा हा युवक पुण्यात शिकायला आलेला होता. अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला तो शिकत होता पण थोडे अजून पैसे मिळतील ह्या आशेने त्याने माझ्याकडे नोकरीची विचारणा केली होती. मला हे सर्व नवीन होते. कारण तगडे शिक्षण घेत असताना त्याला नोकरी हवी होती. मी थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला तर तो आत्ता झालेल्या निवडणुकीत पण काम केले होते असे म्हणाला पण पेमेन्ट अजून झाले नाहीये ही देखील वाढीव माहिती त्याने मला पुरवली. अभियंता म्हणून करिअर करण्यासाठी येथे आलेला हा तरूण मला आगतिक भासत होता. बरं पगाराची पण माफक नाही तर तगडी अपेक्षा म्हणजे मला हे विकतचं दुखणे. मी त्याला सांगतो असे थातूरमातूर उत्तर दिले. तसा तो उठून निघून गेला. त्याच्या पाठमोर्या आकृती कडे बघत मी तरूणपणी केलेल्या उचापती आठवू लागलो. शिक्षणाकरीता धडपडत केलेला सगळा जीवन प्रवास झर॔कन डोळ्यासमोरून गेला. इथपर्यंत पोहोचण्यात ज्या ज्या घटकांचा संबंध आला त्यांना मनोमन नमन केले. एवढे शिक्षण घेऊन सुध्दा आजकालच्या पिढीला कीती आटापिटा करावा लागतोय ह्याचे मनाला वाईट वाटले. त्या व त्याच्या सारख्या असंख्य तरूणांना सुयश चिंतितो.
Sunday, February 19, 2017
आव्वाज कुणाचा...
हातात कागदाचे पत्रकांचा गठ्ठा, दारात एक बाई उभ्या होत्या मी लगोलग ताडलेच की ह्यांना कुठल्या तरी उमेदवाराने कामास जुंपले आहे. निवडणुकीची हवा असल्याने त्यांना दारात पाहून मला अचंबा वाटला नाही किंबहुना त्या माउलीची किवच आली. परवाच कुठल्याशा एका नवीन उमेदवाराची शोभायात्रा दारावरून गेली त्या मागे हाsss तरूणांचा लोंढा निष्कारण गाड्यांचे कर्णकर्कश चित्रविचित्र हाॅर्न वाजवत अक्षरशः बोंबलत निघालेला पाहीला आणि त्या सर्व जीवांना मी मनातून भ च्या बाराखडीतील शिवीवचनं दिली. नगरसेवक पदा करिता असणारी ही निवडणूक यंदा मात्र उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा पणाला लावणारी वाटावी इतका गाजावाजा आणि मतदार राजावर अक्षरशः प्रचाराचा मारा करून एका नको वाटणार्या उंचीवर नेऊन ठेवलीय. नागरिकांच्या सहनशक्ती ची परिसीमा ह्या वेळी प्रचाराच्या नावाखाली बघितली गेली. एकमेकांवर कुरघोडी करण्यात हे उमेदवार पटाईत असावेत कारण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रचार थाटून नागरिकांच्या डोक्याची मंडई कशी होईल ह्याची पूर्ण तयारी केलेली दिसली. "तुलाच मत देतो बाबा पण हे नसते उद्योग आवर" असे म्हणायची पाळी आली होती. झेंडे मिरवायची विशेषतः कार समोर लावायची फॅशन ह्या वेळी प्रकर्षाने जाणवली. "पोलिस दल हतबल" असे घोषवाक्य पोलीसांसाठी बहाल करावेसे वाटते. निवडणूका बघितल्या आहेत पण एवढा आटापिटा पहील्यांदा बघायला मिळाला. बरं ह्यांना निवडून दिल्यावर ह्या लोकांनी केलेली कामे फत्रा दिसत नाहीत. नागरिकांच्या पैशाचा चुराडा आणि यंत्रणेतील लोकांची कसोटी ह्या निमित्ताने बघायला मिळते. हायटेक प्रचार होताना सभास्थानी पाठ फिरवलेल्या नागरिकांना धन्यवाद. अन्यथा त्या दिवशी पण वहातूक खोळंबा आणि बरीच चिडचिड ही होणारच होती. आज मतदानाची धामधूम संपलीय. मशीन मध्ये काही नशीबवान आणि कमनशिबी लोकांचा सत्तेच्या सारिपाठाची चाल बंद झालीय. आता निकाल लागल्यावर अजून ऊत येणार. तरूणाई कामधंदे सोडून परत झेंडे मिरवत उन्हात फिरणार. मिळाला तर वडापाव आणि सोय झालीच तर चषक रिते करून पूढच्या निवडणुका कशा गाजवायच्या ह्याची चर्चा होऊन पांगापांग होणार. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी काळे होते का गोरे हे आपण विसरणार. ही साठमारी अशीच चालू राहणार. औट घटकेचा मतदार राजा पुनश्च आपल्या आयुष्याची लढाई लढणार. सोशल मिडियावर शेअर केलेले फोटो पुढच्या वर्षी आठवणीत येणार. पण आज बजावलेल्या कर्तव्याचे चीज झाले आहे का हे कळायला कुठे जायचे ह्याचे उत्तर शोधेपर्यत पुढील निवडणूकचे पडघम ऐकू येणार...
थोडक्यात काय तर मुकी बिचारी कोणीही हाका.....
Thursday, February 9, 2017
चूटपूट...
प्रसंग एक-
मी कामात गर्क आहे. दुकानात अजूनही बाकीचे लोक काम करतायेत. पसारा हा दिसतोय पण काम पूर्ण झाल्यानंतरच त्याला हात लावता येणार हा विचार येतो न येतो तोच मागून एक पोरगेलासा आवाज...
ओ भाव... ओ भाव..
मी कामातून डोके बाहेर काढत त्याला विचारले " काय पायजे"
हा एवडा फाम भरून द्याल काय..
दहा वर्षांचा मुलगा लाल भडक रंगाचा शर्ट घालून माझ्याकडे बघत होता. मागे एक ऐशी च्या आसपास पोहोचलेले आजोबा जाड भिंगाच्या चष्म्यातून माझ्या प्रतिसादाची वाट पहात होते. चष्म्याच्या दोन्ही काड्या बांधून ठेवायला दोरा गुंडाळला होता. पायात मळकट धोतर, अंगात सदरा बहुतेक बाहेर गावचे असावेत असा अंदाज मी लावला. त्या मुलाला मी विचारले " शाळेत जातोस ना मग हा फार्म भरता येत नाही का तुला? तर त्याने नकारार्थी मान हलवली. बाजूला बॅक असल्याने हे नवीन नव्हते मला. मी त्याला आत बोलावून नाव विचारले तर त्याने सांगितले " "विजय कानकात्रे"
कुठचा रे तु? माझा पुढचा प्रश्न !!
मी... बीडचा पण आता र्हायला पुन्यातच. शाळत सांगितलय हीथ अकाउंट काढायला, माझे गणवेशाचे पैसे जमा होणारेत डायरेक्ट...
बरं बरं... असं म्हणत मी त्याचा फाॅर्म भरून द्यायला सुरवात केली. कसा भरतात हे देखील त्याला दाखवले. पाचच मिनिटात हे सर्व उरकले तो निघाला तसा त्याने मला पुढचा फाॅर्म भरायला पेन मागितले पण दुकानात गडबड असल्याने मी "बॅकेत बघ" असा सल्ला देत पिटाळला.. यथावकाश कामे संपवून मी बाहेर पडलो आणि सहजच विचार डोकावला की अरे मी त्याला पेन देऊनच टाकायला हवे होते. तेवढीच त्याची एक विवंचना हलकी झाली असती.. पण विचाराच्या तंद्रीत मी एक छोटे सत्कर्म करायचे विसरलो..
प्रसंग दोन
मी बुलेट वर स्वार... रस्ता कापतोय.. अचानक समोर चारचाकी वाहने रस्त्यावर काहीतरी पडल्याने वळसा घालतायत. क्षणभर मनात विचारांचे वादळ.. काय बघायला मिळेल काही शाश्वती नाही. एवढा होइतो मी तिथपर्यंत पोहोचतो ... आणि बघतो तर काय रस्त्यावर एक झाडाची डहाळी पडलीय की जी नुकसान करेल इतपत मोठी आहे.. अरे..अरे..अरे.. हे काय मी ही त्याला वळसा घालून माझा रस्ता धरलाय. ती डहाळी मी बाजूला करताना स्वतःला फक्त विचारात बघतोय ... मी पण तसाच पुढे जातो... डहाळी तशीच...वाहतूक तशीच वळसेदार.. मी मात्र घाईत निघालेला एक निष्क्रिय प्राणी...
वरील दोन्ही प्रसंगात काहीतरी बदल घडवता आला असता पण विचारचक्रात अडकून काहीही घडले नाही. इथून पुढे तरी प्रसंगावधान घडो हीच मनोकामना....
आमेन
Saturday, October 8, 2016
कथा शहंशाहच्या भेटीची
साल असावे 2011.. सिंबायोसिस च्या एका संस्थेत सेवा बजावत असताना आलेला हा योग कधी न विसरण्या सारखा. त्या वेळी कौन बनेगा करोडपती चा दुसरा सीजन चालू झाला होता. प्रेक्षक संख्या जास्त दिसावी ह्या करीता मिडिया च्या विद्यार्थ्याना पाचारण केले जाते...का तर, पुढील काळात त्यांना असे कार्यक्रम तांत्रिक अनुषंगाने कळावेत. पुण्याहून सकाळी लवकर निघून गोरेगाव येथे पोहोचण्यास वेळ लागलाच. दादासाहेब फाळके चित्रनगरीत सोळा नंबर स्टुडिओत आमची जेवणाची व्यवस्था सोनी वाहीनी तर्फे केलेली होती. आमच्या आधीच काही मंडळी येऊन थांबली होती प्रत्येकाला आत सेटवर कधी जातो असे झाले होते. बच्चन सरांना बघता येणार ते ही याचि देही याचि डोळा... दुग्धशर्करा योग आला होता. दोनेक च्या सुमारास आत जायचा पुकारा झाला आणि गारेगार वातावरणात प्रवेश करते झालो. नजर भिरभिरत सरांना शोधत होती पण तेच दिसत नव्हते. वाहीनी ची लोक स्पर्धकांना टिप्स देण्यात मग्न होते. अधूनमधून सेट स्वच्छ दिसण्या करिता पोछा मारायचे काम केले जात होते. आम्हाला पण कसे हसायचे आणि कशाप्रकारे टाळ्या पिटायच्या ह्याची तयारी करवून घेतली गेली. सूत्रबद्ध आणि शिस्तीत काम चालू होते. हे सगळं होऊस्तोवर पाच कधी वाजले कळलेच नाही तेवढ्यात दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे आगमन झाले. आणि सुरू झाला एक रोमांचक शो जो इतके दिवस टिव्हीवर पहात आलो होतो....तो आज समोर घडताना बघत होतो एका अचाट शक्तीचा अनुभव घेत होतो. व्यावसायिक कलाकार म्हणजे काय हे तिथेच कळले. सेटवरचा माहोल इतका बदलला की सर्व जण तल्लीन होऊन गेले. त्यांनी आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधत ही कामगिरी लिलया पार पाडली. नेटके आयोजन तितकाच ताकदीचा कलाकार हा योग मस्त जुळून आला होता. मध्येच एक पावसाची जोरदार सर आल्याने चक्क शुट थांबले कारण वरच्या पत्र्यावर वाजणारा आवाज काहीसा भयावह होता. पण नंतर सर्व काही सुरळीत पार पडले. कार्यक्रम संपल्यावर बच्चन सर स्वतः येऊन प्रेक्षका बरोबर फोटो काढून घेत होते. सुंदर असा हा पाच तासांचा प्रवास संपल्यावर मनाला हुरहूर लागुन राहीली आता परत कधी हा योग पुन्हा येणार नाही ह्याची. ते पाच तास खरतरं आयुष्यातील सुखद अनुभव म्हणून मी जपून ठेवले ते कायमचेच...