Tuesday, December 22, 2020

एक सकाळ अशीही

 आताशा मी तसा रोजच सकाळी फिरायला जायचा चंगच बांधलाय गेले महिना भर तरी मी रोज सकाळी उठून नित्यनेमाने बाहेर फिरावयास जातोच जातो. कानात रेडिओ त्यात विविध भारती ची जुनी गाणी हा आता रोजचा शिरस्ता झालाय. त्यात एक अजून दागिना आपल्या सर्व लोकांच्या नाकाला लागलाय आणि तो म्हणजे मास्क,ज्या पासून पुढील सहा महिने तरी सुटका नाहीये असे ऎकीवात येतेय असो. घराबाहेर पडल्यावर मी तसा  नाका समोर चालायला सुरवात करतो. सातारा रोड सकाळी पार करणे हे देखील दिव्य आहे. वाहनाचा राबता आता बराच वाढलाय पूर्वी पुण्यात असला काही नव्हतं एखाद गाडी आलीतर यायची नाहीतर सगळीकडे सामसूम असायची. चालायला सुरवात झाल्यावर गाणी ऐकता ऐकता मी काही निरीक्षण करत असतोच. जसे कि आपल्याला तेच तेच लोक तेच तेच कपडे घालून भल्या सकाळी दिसतात.काही लोक भाजी घेऊन विकायला बसलेली असतात काही लोक तीच भाजी घेऊन ऑफिसला डबा  घेऊन जायच्या तयारीने येतात. रस्त्याच्या कडेला एखादा भिकारी कुडकुडत झोपलेला आढळतोच.काही लोकांचा चालण्याचा वेग हा जास्त असतो काही लोकांचा रमत गमत चालण्याचा मूड असतो. सूर्यनारायण जेव्हा दर्शन देतात तेव्हा काही मंडळी हटकून फुटपाथ वर थांबून त्याचे दर्शन घेतात. नाही म्हणायला काही लोक शेकोटी करून कोंडाळे करून गप्पाचा डाव मांडून बसलेली असतात. सकाळी अजून एक हटकून दिसणारे दृश्य म्हणजे रस्त्यावरील  भटकी कुत्री... रात्र सरलेली असते ह्यांना भूक हि लागलेली असते मग काही लोक त्यांना खायला खाऊ आणून देतात तर काही लोक त्यांना प्रेमाने जवळ घेताना हि दिसतात. रस्त्यावर गर्दी कमी असते म्हणून असेन किंवा सकाळी घाईची वेळ असेन म्हणून असेन दोन चाकी वाहनाचा वेग हा विलक्षण असतो आणि धडकी भरवणारे आवाज करत हि सुसाट वेगात जात असतात. मनपाचे कर्मचारी देखील सकाळी साफ सफाई च्या कामात गुंतलेले असतात. त्यांना त्रास द्यायला डुकराच्या झुंडी कचरा चिवडून रस्त्यावर आणायची कामे इमाने इतबारे करताना मला रोज आढळतात.सध्या सकाळी थंडी गुलाबी असल्या कारणाने आसमंत सगळं धुक्याची दुलई पांघरून असतो.  रोजच्या प्रमाणे मी आजही मी बाहेर पडलो होतो साधारण ४ किमी चा माझा रोजचा वॉक असतोच. आज सकाळी जरा नवल घडले. मी सहसा अनोळखी लोकांना कधी ओळख दाखवत नाही पण सोसायटी मध्ये आत येताना महानगर पालिकेचा एक कर्मचारी रास्ता झाडात असताना मला अनाहूतपणे गुड मॉर्निंग म्हणाला मी देखील त्याला सहज विश करत पुढे आलो पण अशिक्षित आणि रास्ता झाडणाऱ्या एक सफाई कर्मचाऱ्याने मला सकाळी सकाळी दिलेला हा सुखद धक्का होता... माझी सकाळ तर तशी तरोताजा सुरु झाली पण त्यालाही मला विश करावेसे वाटले  हे पाहून मनोमन सुखावलो आणि घराकडे झपझप चालू लागलो.  

Monday, October 19, 2020

मी ..विचार आणि फुले...

 पावसाळ्या नंतर महाराष्ट्रातल्या डोंगरावर जणू फुलाची आरास फुलते आणि मग सुरु होतो रंगाचा खेळ. निसर्ग मुक्त हस्ते आपल्या दोन्ही हाताने हिरवाई वर जणू  फुलांचा बगीचा फुलवतो त्याला मग नसते कसले बंधन कि आडकाठी आपण फक्त आणि फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा आणि मनोमन धुंद फुंद होऊन जायचे. खूप दिवसापासून माझा कॅमेरा अडगळीतून मी बाहेर काढला आणि चालू पडलो ह्या निसर्गाच्या नवलाईचा सोहळा बघायला नवरात्री चा आरंभ ते दिवाळी पर्यंत हा सोहळा आपण अनुभवू शकतो ह्याला कोठेही जंगलात जायची गरज लागत नाही कि कुठेही शहरापासून लांब .....



मी मनोमन कॉसमॉस फुलाचे फोटो काढूयात हि इच्छा ठेऊन बाहेर पडलो तशी डोंगर हा पुणेकरांसाठी काही नवीन नाही पुणे शहर हेच डोंगराच्या कुशीत वसले असले कारणाने चहूबाजूला कुठेही जाऊन आपण त्याचा स्वाद घेऊ शकतो. ठरल्या वेळेनुसार मी तळजाई च्या पठारावर पोचता झालो कॅमेरा गळ्यात लटकावून सगळी आयुध मी  सरसावून फोटोग्राफी ला सुरवात केली पण मनासारखा लाईट काही मिळत नव्हता नुकताच शहराला माघारी फिरणाऱ्या मान्सून चा फटका बसला असलेने ढगांची तुरळक उपस्थिती होतीच त्यामुळे सकाळची कोवळी किरण काही अजून जमिनीवर पडली नव्हती.एव्हाना माझ्यातला फोटोग्राफर जागृत झाला होता. रोज फिरायला जायची सवय असल्या कारणाने मी तशी तंग पॅन्ट अर्थात बर्मुडा घालून बाहेर पडलो होतो. जामानिमा सगळा असला तरीही सह्याद्री मध्ये काळानुसार आणि ऋतूनुसार कीटकांची उपस्तीथी असते ह्याचे भान विसरायला झाले होते. मी मुख्य रस्त्यावर थोडासा आत जायचा प्रयत्न करत होतो जेणेकरून मला शांततेने माझ्या फोटोग्राफीचा आनंद लूटता यावा. एव्हाना रस्त्यावर हौसे  नवसे गवसे असे सगळी मंडळी व्यायाम कमी पण गप्पाष्टकामधे रमत मार्गक्रमणा करत होती. माझे लक्ष हे फक्त फुल आणि कोवळी उन्हे ह्याचा शोध घेत होती आणि अखेर ती वेळ आली सूर्यकांत तळपदे अर्थात सूर्यनारायणाने दर्शन दिले आणि मी सरसावून माझ्या छंदाला क्लिक क्लिकाटाची जोड देत अजून काही चांगले फोटो येतात का हे पहात होतो अजून अजून करत मी तसा चांगलाच आत आलो होतो सुरवातीला असणारा माझा उत्साह आता मावळतीकडे निघाला होता त्याला कारण हि तसेच होते. माझ्या पायाला गवतांमधील कीटक चावायला सुरवात झाली होती आणि चांगलेच लाल लाल झाले होते. हे सगळं करत असताना मला आताशा जाणीव व्हायला लागली होती कि माझा हात थरथर कापतोय आणि इतक्या वर्षाची माझी थोर तपस्या माझ्या आळसाने धुळीस मिळवली आहे. कारण फोटोग्राफी हा छंद फक्त आणि फक्त तुमच्या कौशल्यावर आधारित आहे एकदा का कॅमेराचा आणि तुमचा संबंध सुटला कि तुमचा हात थरथरला... तेच माझेही व्हायला लागले होते. मी अजून काही मनातले जे फोटो हवे  तसे काढायचा प्रयत्न केला पण मना जोगते फोटो मी काही काढू शकलो नाही आणि झरझर पावले टाकत मी मुख्य रस्त्याला आलो जेणेकरून मी कीटक पासून सुटका करून घेऊ शकेन. अर्थातच माझा फोटोग्राफीचा  बेत पूर्णत्वास गेला नाहीच. मी हिरमुसल्या मनाने बाहेर पडलो ते पुढच्या वेळेस नक्कीच चांगले फोटो काढीन ह्या इराद्याने...

Saturday, March 11, 2017

अनुभवासाठी दाहिदिशा

दिवेलागण झालेली... संध्याकाळ आताशा रात्री  कडे झुकलेली... मी  रोज  सारखाच  दुकानात  बसून  काही  कामाचा  निपटारा  करण्यात  मग्न... अचानक  एक  तरूण  दुकानात  शिरला. दाढी  वाढलेली.. थोडे  तर्राट वाटणारे डोळे... अंगावर  नेहमी  प्रमाणे  डगलं चढवलेली... कपडे  बहुधा  दिवसांच्या  अंतराने  धुवत असावा...आत  येण्याची  परवानगी  घेऊन  माझ्यासमोर  बसला. नजर  भिरभिरती  असल्याने  मला  अंदाज आला  की  हे  गिर्‍हाईक  नाहीये. मी  विचारपूस केली  पण  तसे  त्याचे  नियोजन  नव्हते. एक  दोन  मिनिटाच्या  अंतराने  त्याने  मला  नोकरी  द्याल  का  असे  विचारले. हा  प्रश्न  माझ्या  करीता  जरा  वेगळा  असल्याने क्षणभर  गोंधळ  उडाला.
पण  सावरतच मी  त्याला  त्याची  माहिती  विचारली. हिंगणघाट चा  राहणारा हा  युवक  पुण्यात शिकायला  आलेला  होता. अभियांत्रिकी च्या  अभ्यासक्रमाच्या  शेवटच्या  वर्षाला  तो  शिकत  होता  पण  थोडे  अजून  पैसे  मिळतील  ह्या  आशेने  त्याने  माझ्याकडे  नोकरीची  विचारणा  केली होती.  मला  हे  सर्व  नवीन  होते. कारण  तगडे  शिक्षण  घेत  असताना  त्याला  नोकरी हवी  होती. मी  थोडी माहिती  काढायचा प्रयत्न केला तर तो  आत्ता  झालेल्या  निवडणुकीत  पण  काम  केले  होते  असे  म्हणाला  पण  पेमेन्ट  अजून  झाले  नाहीये  ही  देखील  वाढीव  माहिती  त्याने  मला पुरवली.  अभियंता म्हणून करिअर  करण्यासाठी येथे  आलेला  हा  तरूण  मला  आगतिक भासत  होता.  बरं पगाराची  पण  माफक  नाही  तर तगडी  अपेक्षा म्हणजे  मला  हे  विकतचं दुखणे. मी  त्याला  सांगतो  असे  थातूरमातूर  उत्तर  दिले. तसा  तो  उठून निघून  गेला. त्याच्या  पाठमोर्‍या  आकृती  कडे  बघत  मी  तरूणपणी केलेल्या  उचापती  आठवू  लागलो. शिक्षणाकरीता धडपडत केलेला  सगळा जीवन प्रवास झर॔कन डोळ्यासमोरून गेला. इथपर्यंत  पोहोचण्यात  ज्या  ज्या  घटकांचा  संबंध  आला  त्यांना  मनोमन  नमन केले. एवढे  शिक्षण  घेऊन  सुध्दा  आजकालच्या  पिढीला  कीती  आटापिटा  करावा  लागतोय ह्याचे  मनाला  वाईट  वाटले. त्या  व त्याच्या  सारख्या असंख्य  तरूणांना  सुयश  चिंतितो.

Sunday, February 19, 2017

आव्वाज कुणाचा...

हातात  कागदाचे  पत्रकांचा गठ्ठा, दारात  एक  बाई  उभ्या  होत्या मी  लगोलग  ताडलेच की  ह्यांना  कुठल्या तरी  उमेदवाराने  कामास  जुंपले आहे. निवडणुकीची  हवा  असल्याने  त्यांना  दारात  पाहून  मला  अचंबा  वाटला नाही  किंबहुना  त्या  माउलीची किवच आली. परवाच  कुठल्याशा  एका  नवीन  उमेदवाराची  शोभायात्रा  दारावरून  गेली  त्या  मागे  हाsss तरूणांचा लोंढा  निष्कारण  गाड्यांचे  कर्णकर्कश  चित्रविचित्र हाॅर्न वाजवत  अक्षरशः  बोंबलत  निघालेला  पाहीला  आणि त्या  सर्व  जीवांना मी  मनातून  भ च्या  बाराखडीतील  शिवीवचनं दिली. नगरसेवक  पदा करिता  असणारी  ही निवडणूक  यंदा मात्र  उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या  प्रत्येक  माणसाची  प्रतिष्ठा पणाला लावणारी  वाटावी  इतका गाजावाजा  आणि  मतदार  राजावर  अक्षरशः  प्रचाराचा  मारा करून  एका नको  वाटणार्‍या  उंचीवर नेऊन ठेवलीय. नागरिकांच्या सहनशक्ती  ची परिसीमा  ह्या वेळी  प्रचाराच्या नावाखाली  बघितली  गेली. एकमेकांवर  कुरघोडी  करण्यात  हे  उमेदवार  पटाईत  असावेत कारण  वेगवेगळ्या  माध्यमातून  त्यांनी  प्रचार  थाटून  नागरिकांच्या डोक्याची  मंडई  कशी  होईल  ह्याची  पूर्ण  तयारी  केलेली  दिसली. "तुलाच  मत  देतो  बाबा  पण  हे  नसते  उद्योग  आवर" असे  म्हणायची  पाळी आली होती. झेंडे  मिरवायची  विशेषतः  कार  समोर  लावायची  फॅशन  ह्या  वेळी प्रकर्षाने  जाणवली. "पोलिस दल हतबल"  असे  घोषवाक्य  पोलीसांसाठी बहाल करावेसे  वाटते. निवडणूका बघितल्या आहेत  पण  एवढा  आटापिटा  पहील्यांदा बघायला  मिळाला. बरं  ह्यांना  निवडून  दिल्यावर  ह्या लोकांनी  केलेली  कामे  फत्रा दिसत  नाहीत. नागरिकांच्या  पैशाचा  चुराडा  आणि  यंत्रणेतील  लोकांची  कसोटी  ह्या  निमित्ताने  बघायला  मिळते. हायटेक  प्रचार  होताना  सभास्थानी  पाठ  फिरवलेल्या  नागरिकांना  धन्यवाद. अन्यथा  त्या  दिवशी  पण वहातूक खोळंबा आणि बरीच चिडचिड ही  होणारच  होती. आज मतदानाची धामधूम  संपलीय. मशीन मध्ये काही नशीबवान  आणि  कमनशिबी  लोकांचा सत्तेच्या सारिपाठाची चाल  बंद  झालीय. आता निकाल  लागल्यावर  अजून  ऊत  येणार. तरूणाई कामधंदे  सोडून परत  झेंडे  मिरवत  उन्हात  फिरणार. मिळाला  तर वडापाव  आणि  सोय झालीच तर चषक रिते करून  पूढच्या निवडणुका कशा गाजवायच्या ह्याची  चर्चा होऊन पांगापांग होणार. आपण निवडून  दिलेले प्रतिनिधी काळे होते का गोरे हे आपण  विसरणार. ही साठमारी अशीच चालू राहणार. औट घटकेचा मतदार राजा पुनश्च आपल्या  आयुष्याची लढाई लढणार.  सोशल मिडियावर शेअर केलेले फोटो पुढच्या वर्षी आठवणीत  येणार. पण आज बजावलेल्या कर्तव्याचे चीज झाले आहे का  हे कळायला कुठे जायचे ह्याचे  उत्तर  शोधेपर्यत पुढील  निवडणूकचे पडघम ऐकू  येणार...
थोडक्यात  काय  तर  मुकी  बिचारी  कोणीही   हाका.....

Thursday, February 9, 2017

चूटपूट...

प्रसंग एक-

मी  कामात  गर्क  आहे. दुकानात  अजूनही  बाकीचे  लोक  काम  करतायेत.  पसारा  हा  दिसतोय  पण  काम  पूर्ण झाल्यानंतरच त्याला  हात  लावता  येणार हा  विचार  येतो न येतो  तोच  मागून  एक  पोरगेलासा आवाज...
ओ भाव... ओ भाव..
मी  कामातून  डोके  बाहेर  काढत  त्याला  विचारले " काय  पायजे"
हा  एवडा फाम भरून  द्याल काय..
दहा  वर्षांचा  मुलगा  लाल भडक  रंगाचा  शर्ट  घालून  माझ्याकडे  बघत  होता. मागे  एक  ऐशी च्या  आसपास  पोहोचलेले आजोबा  जाड  भिंगाच्या चष्म्यातून  माझ्या  प्रतिसादाची वाट  पहात  होते. चष्म्याच्या  दोन्ही  काड्या  बांधून  ठेवायला  दोरा  गुंडाळला  होता. पायात  मळकट  धोतर, अंगात सदरा बहुतेक  बाहेर  गावचे  असावेत असा  अंदाज  मी  लावला. त्या  मुलाला  मी  विचारले " शाळेत  जातोस  ना मग  हा  फार्म  भरता  येत  नाही  का  तुला? तर  त्याने  नकारार्थी मान हलवली.  बाजूला  बॅक  असल्याने  हे  नवीन  नव्हते  मला.  मी  त्याला  आत  बोलावून  नाव  विचारले  तर  त्याने  सांगितले " "विजय  कानकात्रे"
कुठचा  रे तु?  माझा  पुढचा  प्रश्न !!
मी... बीडचा पण  आता  र्‍हायला पुन्यातच. शाळत सांगितलय  हीथ अकाउंट  काढायला, माझे  गणवेशाचे पैसे  जमा होणारेत डायरेक्ट...
बरं बरं... असं  म्हणत  मी  त्याचा  फाॅर्म  भरून  द्यायला  सुरवात  केली. कसा  भरतात  हे  देखील  त्याला  दाखवले. पाचच  मिनिटात  हे  सर्व  उरकले  तो  निघाला तसा  त्याने  मला  पुढचा फाॅर्म भरायला  पेन  मागितले पण  दुकानात  गडबड  असल्याने  मी  "बॅकेत बघ" असा  सल्ला  देत  पिटाळला.. यथावकाश  कामे  संपवून मी  बाहेर  पडलो  आणि  सहजच  विचार  डोकावला  की  अरे  मी त्याला  पेन  देऊनच  टाकायला  हवे होते. तेवढीच  त्याची एक  विवंचना  हलकी  झाली  असती.. पण  विचाराच्या  तंद्रीत  मी  एक  छोटे  सत्कर्म  करायचे विसरलो..

प्रसंग  दोन
मी  बुलेट वर  स्वार... रस्ता कापतोय.. अचानक  समोर  चारचाकी  वाहने  रस्त्यावर  काहीतरी  पडल्याने  वळसा  घालतायत. क्षणभर  मनात  विचारांचे  वादळ.. काय  बघायला  मिळेल  काही  शाश्वती  नाही. एवढा  होइतो मी  तिथपर्यंत  पोहोचतो ... आणि  बघतो तर  काय  रस्त्यावर  एक  झाडाची  डहाळी पडलीय  की  जी   नुकसान  करेल  इतपत  मोठी  आहे.. अरे..अरे..अरे.. हे  काय  मी  ही  त्याला  वळसा  घालून  माझा  रस्ता  धरलाय. ती  डहाळी मी  बाजूला  करताना  स्वतःला फक्त  विचारात   बघतोय ... मी पण  तसाच  पुढे  जातो... डहाळी तशीच...वाहतूक  तशीच  वळसेदार.. मी  मात्र  घाईत  निघालेला  एक  निष्क्रिय प्राणी...

वरील दोन्ही  प्रसंगात  काहीतरी  बदल  घडवता  आला  असता  पण  विचारचक्रात अडकून  काहीही  घडले  नाही. इथून पुढे  तरी  प्रसंगावधान घडो  हीच  मनोकामना....

आमेन

Saturday, October 8, 2016

कथा शहंशाहच्या भेटीची

साल  असावे  2011.. सिंबायोसिस  च्या  एका  संस्थेत  सेवा  बजावत  असताना  आलेला  हा  योग  कधी  न विसरण्या सारखा. त्या  वेळी  कौन  बनेगा करोडपती  चा  दुसरा  सीजन चालू  झाला  होता.  प्रेक्षक  संख्या जास्त  दिसावी  ह्या  करीता मिडिया  च्या  विद्यार्थ्याना पाचारण केले  जाते...का तर, पुढील काळात  त्यांना  असे  कार्यक्रम  तांत्रिक  अनुषंगाने  कळावेत.  पुण्याहून  सकाळी लवकर  निघून  गोरेगाव  येथे  पोहोचण्यास  वेळ  लागलाच. दादासाहेब फाळके  चित्रनगरीत सोळा  नंबर  स्टुडिओत  आमची  जेवणाची  व्यवस्था  सोनी  वाहीनी तर्फे  केलेली  होती. आमच्या  आधीच  काही  मंडळी  येऊन  थांबली होती  प्रत्येकाला आत  सेटवर  कधी  जातो  असे  झाले  होते. बच्चन  सरांना  बघता  येणार  ते ही  याचि देही  याचि डोळा... दुग्धशर्करा योग  आला  होता.  दोनेक  च्या  सुमारास  आत  जायचा  पुकारा  झाला आणि  गारेगार  वातावरणात  प्रवेश  करते झालो. नजर  भिरभिरत  सरांना  शोधत होती  पण  तेच  दिसत  नव्हते. वाहीनी ची लोक  स्पर्धकांना  टिप्स  देण्यात  मग्न होते. अधूनमधून सेट  स्वच्छ  दिसण्या करिता  पोछा मारायचे  काम केले  जात  होते. आम्हाला  पण  कसे  हसायचे आणि  कशाप्रकारे  टाळ्या  पिटायच्या ह्याची  तयारी  करवून  घेतली  गेली. सूत्रबद्ध  आणि  शिस्तीत  काम  चालू होते.  हे  सगळं  होऊस्तोवर पाच  कधी  वाजले  कळलेच नाही  तेवढ्यात  दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे  आगमन  झाले.  आणि  सुरू  झाला  एक  रोमांचक  शो जो  इतके दिवस  टिव्हीवर  पहात  आलो होतो....तो  आज  समोर  घडताना  बघत होतो  एका  अचाट  शक्तीचा  अनुभव  घेत  होतो. व्यावसायिक  कलाकार  म्हणजे  काय  हे  तिथेच  कळले.  सेटवरचा माहोल  इतका बदलला  की  सर्व जण  तल्लीन  होऊन गेले. त्यांनी आलेल्या  प्रेक्षकांशी संवाद  साधत  ही  कामगिरी  लिलया पार  पाडली. नेटके  आयोजन  तितकाच  ताकदीचा  कलाकार  हा  योग  मस्त  जुळून  आला  होता. मध्येच  एक  पावसाची  जोरदार  सर  आल्याने  चक्क  शुट थांबले  कारण  वरच्या  पत्र्यावर  वाजणारा  आवाज  काहीसा  भयावह  होता. पण  नंतर  सर्व काही  सुरळीत पार पडले. कार्यक्रम  संपल्यावर  बच्चन  सर  स्वतः येऊन  प्रेक्षका बरोबर  फोटो  काढून  घेत  होते.  सुंदर  असा  हा  पाच  तासांचा  प्रवास  संपल्यावर  मनाला  हुरहूर  लागुन  राहीली  आता  परत  कधी  हा  योग  पुन्हा  येणार  नाही  ह्याची. ते  पाच  तास  खरतरं आयुष्यातील  सुखद अनुभव  म्हणून  मी  जपून  ठेवले  ते  कायमचेच...

Friday, September 16, 2016

कोणास करू तक्रार बाप्पा !!!

विसर्जना नंतरचा  दुसरा  दिवस सकाळी  नेहमीच्या  वेळी  मी  शोरूम  उघडले  आणि  माझा  माझ्या  डोळ्यांवर  विश्वास  बसला  नाही. परवा  सगळं  ठाकठीक  ठेवलेल्या  वस्तूंची  जागा  बदललेली  होती . एक  काचेची  फ्रेम  खाली  पडून  फुटलेली.. ट्राॅफी  वरून पडून  चक्काचूर.. मी  शेजारी  चौकशी  केली   तर  धक्कादायक  बाब म्हणजे  डीजे  च्या  दणदणाटाने  झालेला  हा  प्रताप हे  ऐकून  माझ्या  मस्तकात  रागाची ठिणगी  पडली.... मी  शिव्यांची  लाखोली  वाहात  असताना  माझ्या  कानात.... प्रथम  तुला  वंदीतो कृपाळा ... गजानना गणराया  चे  स्वर  ऐकू  येउ  लागले... पूर्वी  साजरा  होत  असलेल्या  या  उत्सवाचे बीभत्स  उत्सवात  होत  असलेले  परिवर्तीत रूप  क्लेशदायकच म्हणायला  हवे..
बाप्पाची मिरवणूक  काढून  धमाकेदार  विसर्जन  करण्यात आले. दहा  दिवसांचा  उत्सव  संपला.   पुण्यातील  व पुण्याच्या  आजूबाजूला  असलेल्या  गावातील लोकांना  एक  पर्वणीच  होती. सर्वांनी  धमाल  केली. दरवर्षी  प्रमाणे  ह्या  ही  वर्षी  चैन पडत  नसताना  बाप्पाचा  निरोप  घ्यावा  लागला. बर्‍याच फुकट्यांना  लाईट्स  आणि  डीजे  च्या रटाळ , तद्दन  गाण्यावर  नाचून भरून  पावल्याची  अनुभुती  मिळाली  असेल.  आपण  एका  बुध्दीच्या देवासमोर  मुन्नी ला बदनाम  करत, डीजे च्या आईला शिव्या घालत, झिंगाट नाचून,  सैराट झाल्याची भावना  सुखावून  गेली  असेल. टिळकांनी सुरू केलेल्या  ह्या  बुध्दीच्या देवाच्या लोकोउत्सवाचे  आता  नकोउत्सवात रूपांतर होतेय  असेच  वाटते.  कोणाचे  मंडळ  कीती  भारी , आरास, डीजे  ह्यावर  होणारा  हा  खर्च  टाळून  समाजोपयोगी  कार्य  करणारी  किती  मंडळे  असतील  हे  देवबाप्पाच जाणो. इतकी  तरूणाई ह्या  धूडगुस तालावर  थिरकत  असताना  समाजातल्या  असंख्य  प्रश्नाची  ह्याना  कल्पना  असते  का  असा  प्रश्न पडल्यावाचून रहात  नाही. पण  जे काही  चालू  आहे  त्याची  तक्रार  कोणाकडे  करायची  बाप्पा  हे  सांगशील  का? 
ह्या दणदणाटात आजारी, रूग्ण ह्यांची  कोणी  फिकीर  करत  असेल  का? की  सगळे जण  आपल्याच  मस्तीत  असा  ओंगळवाणा  उत्सव  साजरा  करत  राहणार? असले  बेगडी  स्वरूप  असलेल्या ह्या  उत्सवाची सांगता  कशी  होणार  की  हे  असेच  चालू राहणार?  तक्रार  कोणाकडे  करायची  बाप्पा  हे  सांगशील का?
जे  घडतंय  ते  सगळे  मन  विषण्ण  करणारे  आहे.  मुर्ती स्वरूपात असलेल्या हे बाप्पा !!!  तुझ्यातले देवपण कुठेतरी हरवतयं  ह्याची  ना  खेद ना खंत... ना ही कोणाकडे  वेळ आहे.  माझे नुकसान तर अनाहूतपणे  झालेच असेल  कदाचित पण अजूनही काही लोकांचे नुकसान
झाले असेल त्याची भरपाई ही थिल्लर तरूणाई
भरून देणार का?

व्हाॅटसअप वर  फिरणारी  ही  पोस्ट  बरंच काही सांगून जाते.

आज बाप्पा परतले    
अन् पार्वती चाळतेय ग्रंथ...                    🤗
कारण बाळाने प्रश्न विचारलाय       🤗🤗🤗 
झिंगाट चा काय आहे अर्थ...              

ता. क.- वर मांडलेल्या  विचारात  काही  गणपती  मंडळे अपवाद  असतील