Saturday, August 16, 2014

१५ ऑगस्ट १४: एक विचार


१५ ऑगस्ट म्हटले कि दरवेळी गाणी आणि चौका चौका मध्ये चाललेला गोंधळ हे असेच चित्र काही वर्षापूर्वी पर्यंत सगळीकडे दिसायचे. जवान बद्दल आपुलकी आणि प्रेम व्यक्त करायचा हा दिवस. ज्यांनी आपल्या छाती वर गोळ्या झेलून आज आम्हाला सुरक्षित ठेवले त्यांना वंदण्याचा हा दिवस... पण आपल्यातले किती जण त्या जवाना मध्ये जाऊन हा दिवस साजरा करतात कोणास ठाऊक. इतकी वर्ष मी हि ह्या गोंधळाचा भाग होतो पण आज  मला आपल्या जवाना बद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली आणि नुसती संधी नाही मिळाली तर त्यांना प्रेमाने जेवू  घालायचा पण योग आला.
wolfpack  आणि bikarni  ह्या दोन  मोटार सायकल ग्रुप ने मिळून हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाचे चीज झाले. दिवस उजाडला जणू एक उल्हसित सकाळ. पटापट आवरून बाहेर पडलो आणि तडक खडकीचे 'अपंग पुनर्वसन केंद्र' गाठले आमच्या आधी काही बाय कर मंडळी उपस्थित होतीच. हळू हळू व्हील चेअर वरील जवान मैदानात जमू लागले. ध्वजरोहणा नंतर त्या सर्व जवानांनी तिथे असलेल्या स्पर्धा मध्ये भाग घेऊन चांगला आदर्श निर्माण केला.  माझ्या डोक्यात विचाराचे चक्र फिरायला सुरवात झाली होती. हाती पायी धड असलेल्या लोकांना पण जमणार नाही असे काही खेळ आणि करामती हि मंडळी करत होती आणि त्यांच्या बरोबर नियतीने केलेल्या क्रूर खेळाचा दुखाचा लवलेश हि त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. काय म्हणावे ह्या दुर्दम्य आशावादाला ? किती चटकन आपण एखादे काम जमणार नाही म्हणून सरळ हात झटकतो पण इथे तर ती मुभा नियती ने त्यांना दिलीच नाहीये. त्यांच्या ह्या परिस्थिती कडे बघून धड धाकट लोक जेव्हा एखादी गोष्ट करायला बिचकतात त्याची कीव येत होती.   कितीतरी वेळा आपण सर्व जण काही न काही कारणाने आयुष्यात करायचा गोष्टी मागे ठेवत जातो. त्याला कारणे कुठलीही असोत पण खूप काही करायचे राहून गेले हि भावना कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात असतेच असते. पण मग मनात आलेली कुठलीही गोष्ट करायला आपल्याला कोण आडवते ? शरीराचे सर्व अवयव धड धाकट असताना देखील आपण धजावत नाही... आणि आज इथे तर एका दुर्दम्य गोष्टीचे दर्शन घडत होते. कोणी खेळाडू म्हणून नाव गाजवत आहेत तर कोणाला कब्बडी चे सामने पहायचे आहेत. शरीर नुसती व्हील चेअर वर बसून आहेत पण मनात असलेला आशावाद काय वर्णावा...


आजचा स्वातंत्र्य दिवस खूप काही शिकवून जाणारा ठरला. इतकी वर्ष नुसतेच एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आलो होतो पण तिथे गेल्यावर जगण्याचा खरा अर्थ समजला. दुर्दम्य इच्छाशक्ती,आशावाद, दुखात असून हसणे काय असते याची प्रचीती आली.

Wednesday, May 28, 2014

मेहनतीचे फळ


गेले चारेक वर्ष झाली असतील मी माझ्या स्वप्नाचा पिच्छा पुरवतोय. निरनिराळ्या आघाड्या वर मी निरंतर मनात स्वप्न पाहत होतो.कधी कुठे शिबिराला जा. आवाजावर तयारी कर.असे एक ना अनेक प्रकार आणि प्रयोग चालूच आहेत. एक दोन ठिकाणी नकार हि पचवावा लागला. वेळ देऊन तयारी करून पण काहीच उपयोग झाला नाही आणि मी त्या कंपू मधून बाहेर फेकला गेलो. इतरही अनेक किस्से झाले पण त्यात मी अडकून पडायचे नाही असे ठरवले होते.वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी हि तर ह्या माध्यमाची ताकद आहे हे मी पूर्वी पासून ओळखून होतो पण इथे आल्यावर खरी कसोटी लागली आणि हे क्षेत्र कसे आहे ह्याचे अंदाज यायला लागले.चुकातून  शिकणे  हा माणसाचा स्थायीभाव आहेच पण कधी कधी निराशेचे ढग हि तेवढेच  दाट असतात आणि मग त्यातून तावून सुलाखून बाहेर पडणे हि जमायला हवे. मी खरेतर खूपच चौकस आणि अभ्यासू वृत्ती ने ह्या क्षेत्राकडे बघत आलोय माझ्या कामाच्या ठिकाणी मी ह्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांना जवळून बघितले आहेच पण त्यातील बरीचशी आता मला ओळखतात सुद्धा. खूप काही शिकायचे आहे ही वृत्ती अंगी बाळगली कि आपले मार्ग हि कसे छान खुले होतात आणि आपल्याला मार्गक्रमणा  करणे पण सोप्पे जाते. एवढे सगळे सांगायचा मुद्दा हा कि, कालच माझ्या एका छोटी भूमिका असलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग रंगला. इतके दिवस धावपळ,वेळेचे गणित, घरातल्यांचा राग-लोभ ह्या सर्वावर काल मात झाली आणि  मला त्याचे फळ मिळाले 
गेले सव्वा महिना आम्ही आमच्या नाटकाची तयारी करत होतो. रोज काही ना काही  नवीन शिकत आम्ही आमच्या नाटकाच्या तालमी चालू ठेवल्या होत्या.विषय तसा गंभीर होता पण आमच्या टीम ने एक सुंदर असा प्रयोग काल सादर केला आणि मी इतके दिवस बघत आलेलो स्वप्न हि पूर्ण झाले. "आरंभ" हे नाटकाचे शीर्षक हि किती चपखल. खरोखरच माझ्या आणि इतरही काहींच्या कारकिर्दी करिता आरंभ झाला म्हणायचा... पडद्यामागील भूमिका पण मला काल समजावून घेता आली आणि अंगावर पडलेला लाईट चा स्त्रोत हि अंगावर शहारे आणनारा  ठरला. सुरवात खूपच चांगली झाली. एका उत्कृष्ठ टीम चे दर्शन काल झाले आणि नकळत वाटून गेले कि अरेच्चा.. आपण सारे इतके  एकवटलो  आहोत कि हाच काय ह्याच्या पुढचा प्रत्येक प्रयोग सुंदर होणार आहे.. खरच एका मस्त प्रवासाला काल सुरवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. सर्व आप्त स्वकीयांच्या शुभेच्छा च्या बळावर हि नौका नक्कीच एक चांगला किनारा गाठेल ह्यात शंकाच नाही. 
अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. हि तर कुठे सुरवात आहे असे म्हणा हवे तर.. बघुयात भविष्यात हि नौका कुठे आणि कुठल्या किनाऱ्यावर लागते ते.     

Tuesday, April 22, 2014

सफरनामा कोकणाचा..



नवीन बाईक घेतल्याला आताशा वर्ष पूर्ण होईल पण कुठेतरी लांब जावे हि सुप्त इच्छा पूर्ण व्हायला आठ महिने थांबावे लागले आणि तो दिवस आला. आम्ही ७ लोक आणि ५ बाईक असे शनिवारी १२ एप्रिल १४ रोजी पुण्याहून रवाना झालो. सकाळ चा सुमार आणि थंडी हि खूप वाजत होती पण पावरफुल बाईक ने रस्ता कापण्यात जी मजा आहे ती सांगून काय कळणार महाराजा... त्याला तर गाडी घेऊन हाय वे  गाठावा लागतो असो.वेग म्हणावा तर ८० किमी प्रतितास असा ठेवून आम्ही कोकणच्या दिशेला कूच केले. ह्यावेळी पुनीत सिंग बांगा हाच आमचा लीडर होता फक्त रस्ता मीच त्याला सांगत होतो. वरंध घाट ओलांडून मंडळी कोकणात प्रवेश करती झाली आणि उन्हाची काहिली पण जाणवायला लागली. खेड पर्यंत मस्त गोवा हायवे होता आणि गाड्यांचे कान पिळणे एवढेच काम आम्ही करत होतो कारण रस्ता हा मलई होता.

वाऱ्याशी स्पर्धा करत आमचा प्रवास चालू होता आणि आम्ही खेड सोडून दाभोळ कडे रवाना झालो होतो.  पण पुनीत च्या गाडीने दगाफटका केलाच बाईक पंक्चर झाल्याने आम्हाला थांबणे भाग पडले. उन्ह आता मी म्हणत होती पण गाडीचे काम करणे हि तेवढेच महत्वाचे होते आणि आम्ही ते करून लगेच पुढच्या प्रवासाला निघालो देखील... आता  दाभोळ येथून आम्हाला बाईक फेरी बोट मध्ये टाकून पैलतीर गाठायचा होता. एक मस्त अनुभव घेत आम्ही धोपावे जेटी कडे निघालो


इथे एनरोन प्रकल्प वाकुल्या दाखवत थाटात उभा आहे जो सध्या रत्नागिरी ग्यास कंपनी कडे दिला आहे. कोकण चे क्यालिफोर्निया काही राज्यकर्ते करू शकले नाहीत ह्याचे दुख वाटून न घेत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवले.इथून पुढचा टप्पा हा गुहागर मार्गे तवसाल गाठणे हा होता. दुपार टळून गेली होती.आणि आंम्ही बाईक स्वार आमच्या इप्सित पर्यंत पोचायच्या प्रयत्नात होतो. कोकणात फिरताना एक मात्र मजेशीर असते तिथले रस्ते हे तुमचे स्वागत करायला कायमच  तयार असतात आणि त्यावरून प्रवास करताना एक आत्मिक आनंद हि अनुभवता येतो. इथून आम्ही गुहागर ह्या गावात प्रवेश करते झालो आणि आमच्या बुलेट गाड्या च्या दनदाणाटाने सगळा गाव  बाहेर येवून बघत होता.आम्हाला ह्याची मजा हि वाटत होती. इथून तवसाल साधारण २१ किमी आहे रस्ता वळणे घेत घेत त्या गावातून एका छोट्याश्या जेट्टीवर पोचतो.
पुनःच्ह सर्व गाड्या आता टाकून पलीकडे पोचायचे होते आणि आमचा आता हा शेवटचा टप्पा असणार होता.सरकारने केलेला अणुकरार आणि त्या संदर्भात तिथे होत असलेले बदल आपण डोळ्या देखत बघू शकतो. जयगड जवळच सरकारने अणु वर वीज निर्मिती केंद्र सुरु करायचे घाटले आहे त्या मुळे इथला परिसर आता झपाट्याने कात टाकतोय. डोंगरच्या डोंगर फोडून रस्ते बनवले जातायत आणि इथली भौगोलिक रचनाच बदलत आहे. जिंदाल पॉवर कडे ह्याचे काम आहे आणि ते देखील झपाट्याने पुढे सरकतेय...
  इथे पण  नवीन रस्ता बनत असल्या कारणाने एका कच्च्या सडकेवरून आम्ही धुराळा उडवत समुद्र किनारी येवून पोहचलो आणि आम्ही मालगुंडच्या सीमा रेषेवर आहोत ह्याचे आकलन झाले. परत गाड्यांचे कान पिळत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहचलो होतो.



खूप दिवसा पासूनची  इच्छा  आज पूर्ण झाली होती. जास्त क्षमतेच्या बायिक वरून फिरण्याचा आनंद काही और असतो तो अनुभवल्या शिवाय कळणार तरी कसा...

Wednesday, March 26, 2014

दोन पाखरांचा संसार...

गेले दिडेक वर्ष तरी माझ्या घराच्या बाहेर चिमण्या करिता मी एक घरटे लावून ठेवले होते. त्यांना खाद्य देणे, पाणी ठेवणे हि कामे पण इमाने इतबारे चालूच होती. पण चिमण्या काही केल्या त्या घरट्या मध्ये जात नव्हत्या आणि माझी घोर निराशा होत होती. खरतर, एखाद्या माणसाला कुठले हि घर दिले तर तो लवकर बाहेर पडायचे नाव घेत नाही. जुने भाडेकरू आणि मालक ह्यांच्या मधला वाद तर मी लहान पणापासून बघत आलो आहे. आपल्या चाळीतील भाडेकरूला बाहेर कसा काढायचा आणि आपल्या जागेवर कब्जा कसा मिळवायचा अशा विवंचनेत घर मालक असा हा आज कालचा काळ आणि इथे मी चिमण्या करिता फुकट घराची सोय केली आहे आणि त्या त्यात जात का नाहीत ह्याचे कोडे काही केल्या मला उलघडत नव्हते.असे मी काय चुकीचे घरटे त्यांना बांधून ठेवले आहे कि त्यांनी त्याकडे पाठ फिरवावी. माझ्या मनातला खल काही केल्या मला स्वस्थ बसू देत नव्हता. चिमण्या गायब झाल्या आहेत ह्याची ओरड तर आपण सर्व जण ऐकत आहोतच, पण मग इथे ह्या दिसतात आणि घरट्या कडे का जात नाहीत ?  ह्या गोष्टीमुळे खूप नवल वाटत होते.

त्यांचे घरटे ज्या लाकडी बॉक्स पासून तयार केले आहे ती तर कल्पना अफलातून होती, तरी पण ह्या त्यात का जात नाहीयेत? अखेर काल अर्णव ने ह्याला वाचा फोडली. मी जो लम्बुलका बॉक्स तयार केला होता तो जरा अमळ खोल होता. चिमणी आत जाऊन बाहेर कशी येणार ह्याची कुठलीच सोय त्यात नव्हती. शेवटी मला इतके वर्ष पडलेले कोडे ह्या चिमुरड्याने क्षणार्धात सोडवले होते. तो बॉक्स आडवा केल्यावर चिमण्यांनी त्यांचा संसार मांडायला लगेच सुरवात केली. म्हणजे इतके दिवस मोकळा पडलेला एक सुंदर फ्ल्याट त्यांना आवडला होता. आता पावसाळ्याच्या अगोदर त्या मध्ये एखादा चिमुकला पाहुणा देखील येईल. अर्थातच आमच्या तिघांच्या हि चेहऱ्यावर हसू फुलले. एका मोकळ्या पडलेल्या घरट्याला आता उब मिळाली आहे. 

Saturday, March 22, 2014

पुंजका विचारांचा

वेळ सकाळची. ऑफिसला जायची सर्वाना घाई, साधारण ९ वाजता. स्थळ- सिंहगड रोड... ट्राफिक अडकत अडकत पुढे सरकतंय, उन्ह तापायला लागली आहेत आणि सूर्य आपले काम चोख बजावतोय. मनातले विचार....

च्यायला वैताग आलाय ह्या ट्राफिक चा ssss
हा सिग्नल किती वेळ घेतोय पुढच्या वर्षी ग्रीन होणार कि काय sss 
आयला activa वाली  मस्त ड्रेस घातलाय..
ओ भाऊ, जरा गाडी बाजूला ठेवा नवीन गाडी आहे माझी, घासेल ना sss 
कोणास ठावूक पुण्यात एवढी माणसे कुठून आली आहेत तडमडायला..
नुसत्या टू व्हीलर आहेत राव..
ह्या रोड वर फ्लाय ओवर कधी होणार कोणास माहित...
हे राजकारणी * * घाले आहेत..
सिंहगड रोड ची वाट लावली पार..
धूळ,धूर,घाण,प्रदूषण  वाटते परदेशी राहावे. (मनात हसू) 
कसली sss बिलगून बसलीये राव...( मनात कालवा कालव)
अजून किती दिवस हे अस चालणार काय माहित..
गाडी मस्त ठेवलीये साल्याने.. एकदम चकाचक..
हा पोलिस माझ्या कडे तर येणार नाही ना..
साला, कधी BMW येणार अशी आमच्या आयुष्यात..
काय, खड्डे आहेत यार रोड वर...
नदीकाठचा रस्ता मोकळा असेल तर गाडी जाम बुन्गवता येते ..
कसलं खतरनाक मॉडेल आहे गाडीचे...


हे आणि इतर बरेच विचार मनात येत असतात आपण आणि आपली बाईक हे चालत राहतात. ह्या सर्व विचारात ऑफिस कधी येते हेच कळत नाही. दिवसभर तिथेच थांबायचे असते काही काम नसले तरी...आणि असले तरी..









Saturday, March 15, 2014

माझे खाद्यायन

परवा एका हॉटेल मध्ये जायचा योग आला, खूप दिवसाने मसाला डोसा खायची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. आमच्या बाजूच्या टेबलवर एक मध्यम वयीन फिरंग बाई येउन बसली होती मी खात खात तिचे निरीक्षण करत होतो.खरतर इतकी वर्ष ह्या फिरंग लोकांना बघत आलो आहे ह्या लोकांची ढबच न्यारी असते काही म्हणा ! सांगायचा मुद्दा हा कि, ती पण सावकाश तिच्या डोस्याचा आस्वाद घेत होती. इकडे मी बचक बचक खात होतो भुकेने मला काही सुचत नव्हते आणि हि बया एकदम सावकाश एक एक घास खाऊन चावून चावून रवंथ करीत खात होती. लहान पणा पासून आपण सर्व जण इंग्रजी सिनेमे पाहत आलो आहे पण मला जेव्हा जेव्हा पदद्यावर खायचा सीन दिसायचा आणि हि लोक खाताना दिसायची तेव्हा एकच प्रश्न पडायचा कि हे लोक कमी बोलत कसे खाऊ शकतात आणि आपल्याला का जमत नाही. सिनेमा संपून बाहेर येताना मी संकल्प केलेला असायचा कि मी पण ह्याच पद्धतीने खाणार आणि पुढच्या काही दिवसात माझा हा संकल्प मोडकळीस आलेला असायचा.

सांगायचा मुद्दा हा कि, हि मस्त त्या पदार्थाचा आस्वाद घेत खात होती सोबतीला तिने लायिंम जूस हि मागवला होता मग काय पाहता, तिचे सर्व तब्येतीत चालले होते आणि इकडे मी बायकोच्या शिव्या खात होतो कारण माझे सांभार चमच्या मधून टेबलवर पडून माझ्या तोंडात पोहचत होते.
फिरंग लोका कडून काही नाही तरी त्या दिवशी मी सबुरीने खायचे कसे ह्याचे प्रात्यक्षिक जणू काही शिकून गेलो. आणि नेहमीप्रमणे हॉटेल मधून संकल्प करून बाहेर पडलो कि मी पण चवी चवी ने पदार्थ खाणार.

Monday, March 10, 2014

अज्ञान (?)

काही दिवसा पूर्वी आमच्या सोसायटी मध्ये पाण्याच्या पंपाचे काम चालू होते आणि मी नकळत माझ्या लहानपणीच्या आठवणी मध्ये रमलो. आमचे काकांचे शेत वडकी नाल्याला होते आणि आम्ही शाळेत असताना रविवारी किवा सुट्टी च्या दिवशी त्यांच्या बरोबर कल्ला करायला जात असू. शेतावर आणि बांधावर फिरताना खरच खूप मज यायची. तसे आमचे काम काही नसायचे पण जीप मधून जायला मिळतेय आणि ते हि शेतावर मग काय आम्ही एका पायावर तयार असायचो. १३ एकरात पसरलेलं विस्तीर्ण शेत. गाडी लावायचो तिथे जाई बाईचे  घर आणि विहीर होती तिचे पाणी हि तेवढेच गोड होते. तिथे गेल्यावर थकवा असा जाणवायचा नाहीच. मनसोक्त हुंदडणे हा आमचा क्रम असायचा. किसन बैल घेऊन आला कि त्यांच्या मागे काठी घेऊन जायचे. कुळवणी कशी करतात ह्याचे बिनतोड प्रात्यक्षिक आम्हाला दिसायचे,गोफण फिरवून पाखर उडवणे म्हणजे काय असते हे केल्याशिवाय कळणार नाही. हुरडा पार्टी, मटन पार्टी  हाय ज्या काय झ्याक काट्यागिरी मध्ये मोडणाऱ्या पार्ट्या आहेत त्या आम्ही लहानपणीच झोडल्या. एकेदिवशी काकांबरोबर एका नवीन विहिरीचे काम बघायला जायची संधी मिळाली. शनवार पेठेतून कासम भाई कडून सुरुंगाची दारू आणून ति विहिरीत काम करत असलेल्या कामगारा पर्यंत आम्ही पोचवायचो. पहारीने केलेल्या खोल खड्यात ति दारू भरून वात पेटवली कि लांब लांब पळायचे आणि एकच आवाज होऊन सर्व दगडाच्या ठिकर्या हवेत भिरकावल्या जायच्या स्वताला वाचवत आम्ही जीव घेऊन पळायचो पण परत येउन बघितले कि मोठा खड्डा झालेला दिसायचा आणि मग परत पुढील काम सुरु व्हायचे.त्याकाळी किती माणसे उपलब्ध असायची आणि ३-४ महिन्या मध्ये विहीर बांधून तयार पण व्हायची आज सारखे यंत्रवत तेव्हा काहीच नव्हते.

हे सर्व विचार इतक्या झर्रकन माझ्या मनात येउन गेले आणि मी गुरुजींनी टाकीवर फोडायला घेतलेला नारळ बघून भानावर आलो आणि एक अतिशय बालिश आणि जुनाट प्रश्न मी प्लंबर ला विचारला " अहो, पण इथे टाकीला पाणी चढवायला मोटर कुठाय? त्याने चमकून माझ्याकडे बघितले आणि "काय येडय" म्हणून मला सांगितले कि " साहेब आजकाल मोटारी पण पाण्यात बुडवून ठेवणाऱ्या मिळतात त्यांना बाहेर ठेवायची  गरज लागत नाही" मी चाटच झालो आणि खरोखरच माझ्या अज्ञानाची मला कीव आली आणि तंत्रज्ञान किती पुढारलेले आहे ह्याची प्रचीती... मनोमन मी हात जोडले आणि फक्त पुटपुटलो कालाय तस्मे नमः....

Saturday, March 8, 2014

वेडा राघू...

आज खूप दिवसांनी लिहावेसे वाटले आणि कारणे शोधू लागलो. डोक्यात विचाराचा भुंगा चालूच. काय लिहावे आणि कसे लिहावे ह्याच गोष्टीने मन कातावले होते.आणि मला कारण सापडले... गेल्या दोन तीन दिवसापासून मी जर वेड गळा सारखा वागतोय आसे माझे मलाच जाणवले. बायको ने पण मला विचारले कि कुठे आहेस म्हणून पण माझ्याकडे उत्तरच नव्हते. साध्या साध्या गोष्टीत चुका होत आहेत आणि मी त्या सुधारू शकत नाही. माझे मलाच हसायला येत होते. खूप काही गंभीर नाही पण माझे वागणे मलाच नवीन आहे आणि त्यावर मलाच तोडगा शोधयला  हवाय.आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी पण खूप काही शिकवून जातायत पण बहुदा माझेच शिकायचे मन नाहीये.इतक्या वर्षात मी असा नवीन अनुभव पहिल्यांदा घेतोय. खरतर मनाचा ठोका एकवेळ चुकतो कि हे असच तर चालू नाही न राहणार कि मीच कुठल्या तरी तंद्री मध्ये आहे आणि जग मला बघून हसतंय असा काहीसं मनात दाटून येतंय. बहुदा मनाची अशी घालमेल सर्वांनी कधी न कधी अनुभवली असेल किवा ज्यांची वय झालेली आहेत त्यांनी कदाचित हा अनुभव घेतला हि असेल.खूप काही विचार केला तर हाताला काहीच सापडत नाही आणि मग नुसता हात चोळत बसने हाच एक पर्याय उरतो.बहुदा मीच माझ्या ह्या मनाच्या खेळांकरिता कारणीभूत आहे. उगाच नको ते विचार मनात आणून आजचा माझा दिवस आणि वेळ मीच तर नाही ना वाया घालवत...हे हि कारण असू शकते.

पण खर सांगू का.. माझ्या ह्या मनाच्या खेळांची पण मी मजा घेतोय कारण माझ्यातलाच "मी" शोधायचा प्रयत्न करतोय.मनाचे हे खेळ खरतर सर्वांनी अनुभवले असतील हि कदाचित, दरवेळी आपल्या हाताला काय लागले ह्या पेक्षा जे हाताला लागेल ते लागेल पण ह्या मनाच्या खेळाची मजा तर अनुभवू यात
...