Saturday, March 11, 2017

अनुभवासाठी दाहिदिशा

दिवेलागण झालेली... संध्याकाळ आताशा रात्री  कडे झुकलेली... मी  रोज  सारखाच  दुकानात  बसून  काही  कामाचा  निपटारा  करण्यात  मग्न... अचानक  एक  तरूण  दुकानात  शिरला. दाढी  वाढलेली.. थोडे  तर्राट वाटणारे डोळे... अंगावर  नेहमी  प्रमाणे  डगलं चढवलेली... कपडे  बहुधा  दिवसांच्या  अंतराने  धुवत असावा...आत  येण्याची  परवानगी  घेऊन  माझ्यासमोर  बसला. नजर  भिरभिरती  असल्याने  मला  अंदाज आला  की  हे  गिर्‍हाईक  नाहीये. मी  विचारपूस केली  पण  तसे  त्याचे  नियोजन  नव्हते. एक  दोन  मिनिटाच्या  अंतराने  त्याने  मला  नोकरी  द्याल  का  असे  विचारले. हा  प्रश्न  माझ्या  करीता  जरा  वेगळा  असल्याने क्षणभर  गोंधळ  उडाला.
पण  सावरतच मी  त्याला  त्याची  माहिती  विचारली. हिंगणघाट चा  राहणारा हा  युवक  पुण्यात शिकायला  आलेला  होता. अभियांत्रिकी च्या  अभ्यासक्रमाच्या  शेवटच्या  वर्षाला  तो  शिकत  होता  पण  थोडे  अजून  पैसे  मिळतील  ह्या  आशेने  त्याने  माझ्याकडे  नोकरीची  विचारणा  केली होती.  मला  हे  सर्व  नवीन  होते. कारण  तगडे  शिक्षण  घेत  असताना  त्याला  नोकरी हवी  होती. मी  थोडी माहिती  काढायचा प्रयत्न केला तर तो  आत्ता  झालेल्या  निवडणुकीत  पण  काम  केले  होते  असे  म्हणाला  पण  पेमेन्ट  अजून  झाले  नाहीये  ही  देखील  वाढीव  माहिती  त्याने  मला पुरवली.  अभियंता म्हणून करिअर  करण्यासाठी येथे  आलेला  हा  तरूण  मला  आगतिक भासत  होता.  बरं पगाराची  पण  माफक  नाही  तर तगडी  अपेक्षा म्हणजे  मला  हे  विकतचं दुखणे. मी  त्याला  सांगतो  असे  थातूरमातूर  उत्तर  दिले. तसा  तो  उठून निघून  गेला. त्याच्या  पाठमोर्‍या  आकृती  कडे  बघत  मी  तरूणपणी केलेल्या  उचापती  आठवू  लागलो. शिक्षणाकरीता धडपडत केलेला  सगळा जीवन प्रवास झर॔कन डोळ्यासमोरून गेला. इथपर्यंत  पोहोचण्यात  ज्या  ज्या  घटकांचा  संबंध  आला  त्यांना  मनोमन  नमन केले. एवढे  शिक्षण  घेऊन  सुध्दा  आजकालच्या  पिढीला  कीती  आटापिटा  करावा  लागतोय ह्याचे  मनाला  वाईट  वाटले. त्या  व त्याच्या  सारख्या असंख्य  तरूणांना  सुयश  चिंतितो.