Saturday, August 27, 2016

नामाचा महीमा !!!

वेळ  दुपारची  साधारण  चार ची
ठीकाण लक्ष्मी रोड
सिग्नल  सुटायची वाट बघत  जनता थांबलीये. पुण्यातील  ट्राफिक मुळे  जीव  मेटाकुटीस  आलेला  आहे. गणपतीच्या  खरेदी  करीता टु व्हीलर  धारक  रस्ता  मिळेल  तिकडे  सैरावैरा  गाड्या  हाकायच्या प्रयत्नात... मी  देखील  माझ्या  कामाच्या  ठिकाणी  पोहचण्याचा  केविलवाणा  प्रयत्न  करतोय  इतक्यात  एक  अॅक्टीवा स्कुटर वर  दोन  शिडशिडीत  चणीच्या दोन ललना (बहुधा पुण्याच्या नसाव्यात) बाजूला  येऊन थांबत मला विचारतात...

एक्स क्युज मी  ABC ला कसे  जायचे?
मी.. (क्षणभर गोंधळात..  डोक्यात विचार .. हा कुठला नवा  भाग... मेंदूत चाचपणी ????)
त्या...उत्तराची  वाट  बघतायेत..
मी... सावरून  वाटेला  लावायचे  काम  करतो..
तितक्यात  सिग्नल  सुटतो  आणि माझ्या  डोक्यात  भुंगा...
लहानपण  पुण्यात गेल्यामुळे  असेल  कदाचित  पण ही  अशी  नावे कधी विचारच  केली  नव्हती.अप्पा बळवंत चौकाचे  ABC हे नाव  बहुधा परप्रांतीयांनी दिलेले  असावे. पण नाही  म्हणता ही फॅशन रूढ होत आहे. प्रत्येक नाव  ठेवायच्या  मागे  काहीतरी  इतिहास किंवा त्या  त्या व्यक्तिला दिलेला सन्मान असतो. पण  तिच्या  तोंडून बाहेर  आलेले  इंग्रजाळलेले शब्द  ऐकून  कीव आली. शाॅट॔कट हा  या  पिढीला  लागलेला  रोग  म्हणावा का  इतपत  विचार  डोकावून गेला. पुर्वी  मोबाईल  हा  प्रकार  नसल्यामुळे पत्रात  पूर्ण  वाक्य  लिहावी  लागायची  वीस  पैशात  मनातले  सगळे  त्या  सरकारी  छापील  कागदावर  लिहून झाल्यावर  बरे  वाटायचे तेव्हा  जर  हे  असले  फाजील  शाॅट॔कट  असते  तर वाचणारा घेरी  येऊनच  पडला असता. अर्थात  एकदा  पत्रातला  हा  शहाणपणा  मी  वाचलाय.
लआमोनविवि .... खेळ खल्लास.. खूप विचाअंती कोडे उलघडले ते असे... लहानांना आशिर्वाद  मोठ्यांना नमस्कार विनंती विशेष..
पण मजकूर लिहायला जागा कमी असते ह्या  एका विचाराने माफ  केले. पण  इथे  बोलताना  पण  शाॅट॔कट  म्हणजे जरा अतीच झाले. मोबाईल  वरील  शाॅट॔कट  लिहीणे  म्हणजे  कहर  आहे. गेले एक  तप  मोबाईल  वापरतोय  पण  ह्या  असल्या  जगड़व्याळ गोष्टी  अजूनही  समजण्याचा  पलिकडल्या  आहेत. तशीही  पुण्यातील  ठिकाणाची  नावे  खुमासदार त्यात हे  असले बोलणे म्हणजे बालपण पुण्यात गेलेले  आजोबा हे असलं ऐकून फेफरं  येऊन पडतील. केपी (कोरेगाव  पार्क ) पण त्यातलाच  प्रकार.  थोडक्यात  काय तर  येणाऱ्या काळात या  असल्या गोष्टी  कानी  पडणार... होता होइल ते आपणच  शहाणे  व्हावे  अन्यथा  समोरची व्यक्ती आपल्याला  येडछाप ह्या कॅटेगरीत अलगद नेऊन कधी ऊभी करेल ह्याचा नेम नाही.

Monday, August 22, 2016

सुंदर ते हात...

पी.व्ही.सिंधु च्या रौप्यपदकाच्या निमित्ताने द्वारकानाथ संझगिरीने पुलेला गोपीचंद वर लिहिलेल्या लेखातील काही भाग....

'सुंदर ते हात, ज्याला निर्मितीचे डोहाळे.’

सिंधूला घडवणारे हातही फार महत्त्वाचे आहेत. ते पुलेला गोपीचंदचे आहेत. या देशात चंद्रगुप्तएवढाच चाणक्य मोठा ठरतो. कारण गुरू-शिष्य परंपरेचं महत्त्व या आपल्या संस्कृतीत मुरलंय! हे पदक सिंधूइतकंच गोपीचंदचं आहे असं म्हणावं इतके परिश्रम त्याने घेतले आहेत. आपल्या देशाने काही महान खेळाडू निर्माण केले. त्यात एक गोपीचंद! त्याने 2001 साली ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप म्हणजे बॅडमिंटनचं विम्बल्डन! त्यापूर्वी एकाच भारतीयाने ती जिंकली होती तो म्हणजे प्रकाश पदुकोण. एकेकाळी जगात तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू होता. शीतपेयाची जाहिरात त्याच्याकडे एका मोठ्या चेकसकट चालत आली. त्यानं चक्क नाही म्हटलं. कोकची सवय लहान मुलांना हानिकारक म्हणून? तो क्रिकेटपटू नव्हता, लागोपाठ जाहिरातींच्या कॉण्ट्रक्टस मागे धावायला! ही काळ्या कपड्यातील लक्ष्मी नव्हती. ही शुभ्र कपड्यातली लक्ष्मी होती. त्यावर एक छोटासा डाग आहे असं त्याला वाटलं. त्याने तिला झिडकारलं! तो अचानक मनात वेगळ्याच जागी जाऊन बसला. फारशी लाडकी मंडळी तिथे जाऊन बसलेली नव्हती. मीसुद्धा त्यावेळी गोपीचंदच्या बुटात पाय घालून उभा असतो तर तसा वागलो असतो असं वाटत नाही. मी हुशारीने तो डागच नाही असं मनाला समजवलं असतं. माणूस मुखवटा चढवू शकतो. स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. पुढे दुखापतीमुळे त्याला लवकर निवृत्त व्हावं लागलं. त्याच्या या काळात त्याला लक्षात आलं की, भारतात अशा दुखापतींवर मात करून पुन्हा घट्टपणे उभं राहायच्या सुविधा नाहीत. त्याने देशाला, नशिबाला कुणाला दोष दिला नाही. त्याच्या डोक्यात क्रांतिकारी विचार आला. आपण त्या सुविधा निर्माण केल्या तर? भविष्यात एखाद्या गोपीचंदला कारकीर्दीवर पाणी सोडावं लागणार नाही. नवे दर्जेदार खेळाडूही तयार करता येतील. बा.भ. बोरकरांनी म्हटलंय, ‘‘सुंदर ते हात, ज्याला निर्मितीचे डोहाळे.’’

गोपीचंदच्या हाताला निर्मितीचे डोहाळे लागले म्हणून आपण सिंधू काय, श्रीकांत काय पाहतोय.

यापूर्वी अनेक खेळाडूंनी या देशात वल्गना केल्या आहेत- ‘‘जे खेळातून कमावलंय ते खेळाला परत द्यायचं!’’ काहींनी फक्त वल्गना केल्या. काहींनी प्रयत्न केले. काही आजही वल्गना करतायत. पण गोपीचंद प्रत्यक्षात ते करतोय. त्याचा दर्जा, त्याचा त्याग वेगळाच आहे. व्यावसायिकतेच्या वेगळ्याच स्तरावर तो उभा आहे. त्या स्तरावरचा दुसरा भारतीय खेळाडू मला कष्टाने शोधावा लागेल. त्याला आंध्र सरकारने हैदराबादच्या आयटी कॉरिडॉरमध्ये पाच एकर जागा स्वस्त दरात दिली. त्याच्या प्रोजेक्टचा खर्च होती तेरा कोटी! त्याने काही क्रीडाप्रेमी लक्ष्मीपुत्रांकडे मदत मागितली, पण त्याला फार यश आलं नाही. बॅडमिंटन म्हणजे ग्लॅमर असलेलं क्रिकेट नव्हे किंवा त्याला आयपीएलप्रमाणे ग्लॅमरस बाजार उभारायचा नव्हता. कोण कशाला पैसे देईल? गोपीचंदने आपलं घर गहाण ठेवलं आणि साडेतीन कोटी उभे केले. थोडक्यात, घरावरून नांगर फिरला जाण्याची मानसिक तयारी केली. मग निम्मा गुड्डा प्रसाद नावाचा बिझनेसमन त्याच्यामागे पाच कोटी घेऊन राहिला. त्याची अट एकच! ‘‘एक तरी ऑलिम्पिक मेडल जिंकून दे.’’ गोपीचंदने त्याला आता दोन मिळवून दिली. 2012ला सायना नेहवाल आणि आता सिंधू!

गोपीचंदची कहाणी इथे संपत नाही. इथून सुरू होते. सुविधा उभ्या राहिल्यावर जास्त कष्ट सुरू होतात. तो रोज सकाळी चार वाजता ऍकॅडमीत येतो. हे तो बारा वर्षे करतोय. सकाळचे पहिले तीन तास सिंधू-श्रीकांतसाठी असतात. सिंधूचा स्टॅमिना का चांगला? ती स्मॅश का चांगली मारते? ती शटलकॉकपर्यंत कशी पटकन पोहचते? तिचे गुडघे, खांदे वगैरे तिला इतकी सुंदर साथ का देतात? कारण मशिनगनमधून शटलकॉक कोर्टाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी, विविध उंचीवरून आणि कोनातून टाकली जातात आणि सिंधू तिथे पोहचतेय हे तो पाहतो. एक तासाचा स्टॅमिना असावा आणि लाँग रॅलीज खेळून घणाघाती स्मॅश मारले पाहिजेत. त्यासाठी हा अट्टहास आहे. परवा उपांत्य फेरीत त्या जपानी मुलीवर सिंधूचे स्मॅश आगीच्या लोळासारखे कोसळले ना, त्यामागे ही मेहनत आहे. खरं तर त्या मेहनतीचा एकदशांश भाग असावा.

गेले काही महिने गोपीचंद स्वतः कार्बोहायडेट्स खात नाही. कारण यांच्याबरोबर सराव करायला त्याला फिट रहायचंय. सिंधूला तर चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणीपासून मैलभर लांब ठेवलंय. खेळाडूंचा नरसिंग यादव होऊ नये. कुणी घातपात करू नये म्हणून सिंधू-श्रीकांत यांना घराबाहेर पाणी प्यायला मनाई होती. देवाचा प्रसाद आणि तीर्थसुद्धा गोपीचंदने तिला घ्यायला दिलं नाही. त्याला माहीत आहे, अशा वेळी देव रागवत नाही. उलट प्रसन्न होतो. रिओत ती फक्त गोपीचंदबरोबर जेवू शकते आणि रिओत गोपीचंद पहाटे दोन वाजता उठतो. कारण त्याला आधीच्या मॅचचं तासभर ऍनॅलिसिस करायचं असतं. उगाच पदक विजेता तयार होत नाही! संगमरवरात कितीही मूलभूत सौंदर्य असलं तरी प्रत्येक दगडातून ताजमहाल उभा राहत नाही. ते घडवणारे हात बऱयाचदा अदृश्य असतात, पण ते महाल उभा करतात.

ते हात दिसावेत एवढाच हा प्रपंच.

लेखक - द्वारकानाथ संझगिरी.
यांच्या  कडून  साभार

अतिशय सुंदर  असा  हा  लेख... एखाद्या  खेळाडूमागे किती  कष्ट  त्याच्या  प्रशिक्षकाने घेतले  ह्याचा  वस्तुपाठच  घालून  देतो. मुद्दाम  संग्रही  रहावा  म्हणून  मी  माझ्या  ब्लॉगवर  प्रकाशित  करतोय.

Sunday, August 21, 2016

वाह रे सिंधू... वाह रे साक्षी

तसा मी लहानपणा पासून ऑलिम्पिक खेळ  बघतोय. साधारण  ऐशी  च्या दशकात माॅस्को ऑलिम्पिक वर आलेला एक सुंदर  चित्रपटही  मला  बघितलेला स्वच्छ आठवतोय. त्या  ऑलिम्पिक खेळाचा मस्काॅट असलेला अस्वल  ज्याचे नाव "मिशा" होते हे ही अजुन विसरलो  नाहीये. कारण त्या वेळी घराघरात टिव्ही  नव्हते  आजकालची चॅनेल संस्कृती तशी भारतीयापासून कोसो दूर होती.अगदीच  गेलाबाजार सधन घरात एखादा कृष्ण धवल बाॅक्स टिव्ही  असायचा आणि थोडक्यात  दाखवलेल्या क्षणचित्रावर समाधान मानावे  लागायचे. ऑलिम्पिक च्या खेळात पदकांच्या  बाबतीत भारत हा सदैव दुर्दैवी  ठरत आलेला देश हेच राहून राहून वाटायचे. खाशाबा जाधवांनी घेतलेल्या पदकाची माहीती  ही  फार ऊशीराने कळली. ऑलिम्पिक खेळ  सुरू व्हायच्या वेळचे संचलन ही पर्वणीच  असायची. विविध देशांतील  खेळाडू  ऐटीत  चालताना  बघून मस्त  वाटायचे  विशेषतः  भारतीय  संघ  दाखल  होत  असताना ऊर  अभिमानाने भरून यायचा. खेळ  चालू  असताना  वेगवेगळ्या  मासिकात  आलेले  फोटो  कापून  त्याचे  कोलाज करून  ठेवायचा  छंद  जडलेला  असायचा. त्यातून  सर्जी बुबका, जाॅयनर भगिनी, रशियन जिमनॅस्ट येलेना शुशकानोवा,  पीट सॅमप्रास, ऑल टाईम फेवरिट  गॅब्रीअला सबातिनी हे व इतर अनेक खेळाडू  ओळखीचे  होउन गेले ते अजून त्यांना विसरलो  नाहीये.
आजच्या ह्या लेखाचा उद्देश  खरतरं ह्याच्या  शीर्षकात दडलाय. खेळ आणि भारतीयांचे जणू  वाकडे असल्या सारखे वातावरण ह्या दोघींच्या  यशानंतर ढवळून निघालेय. बघावे तिथे साक्षी- सिंधू झळकतायेत. मूलतः खेळ  म्हणजे  वेळेचा  अपव्यय हा समज आपल्या  घराघरांत पसरलेला आहे. अशा कर्मठ समाज  मन असलेल्या  देशातल्या ह्या दोघींचे यश  खचितच उजवे ठरते. विविध  देशांतून आलेल्या  खेळाडू  समोर  कसब  पणाला लावून पदक  खेचून  आणण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याला  तोड नाही. वर्तमान पत्रात आलेल्या  बातम्या  वरून  त्यांनी घेतलेल्या श्रमाची काही टक्के  माहीती होईलही कदाचित, पण एका साध्या 
खेळाडू पासून सुरू  झालेला हा प्रवास नक्कीच सोपा नसणार.... असंख्य मन दुखवणार्या घटनांचा सारीपाट  त्याच्या मागे असणार.. कौटुंबिक पातळीवर  मिळालेला हात तोच काय तर अश्वासक बाकी  सगळं रामभरोसे.. खेळाकरीता असलेल्या  संघटनांचे  राजकारण  हा तर कोणालाच  न चुकलेला  घटक.. कित्येक  खेळाडूची वाटचाल  ह्या  मुर्दाड  राजकारणा पायी  खुरटते.. खेळाडू  म्हटले की जिद्द, मेहनत ह्या  गुणांचा  गुणाकार  करावाच  लागतो अन्यथा  हार गळ्यात  पडलीच.. साक्षी  काय  सिंधू  काय  ह्या  दोघी  असल्या घुसमटून  टाकणार्‍या  व्यवस्थेतून गेल्या  असणारच.. किंबहुना  अशा  महाभयानक  व्यवस्थेचा  भाग असून त्यांनी  ज्या निकराने विजयश्री खेचून आणली ती खरचं कौतुकास्पद आहे. एकशे  पंचवीस कोटी  लोकसंख्या  असलेल्या ह्या महान  देशात दोन महीलांची ही पदक कमाई  खरेच एका विशेष घडणार्‍या घटनांची नांदी  आहे. छोट्या  देशातील  एकच धावपटू  नऊ सुवर्ण  पदकाची  लयलूट करतो म्हणजे किती  कमालीचा  आत्मविश्वास घेऊन तो इथे  आलेला  असतो ह्याची कल्पना करवत नाही. माझ्या  लहानपणा पासून पडलेला प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो. कैक वर्षे पदकासाठी  झगडावे  लागणाऱ्या माझ्या भारत देशा पदकांचा हा दुष्काळ कधी संपेल का? टोकीओ ऑलिम्पिक खेळाची तयारी सुरू झाली म्हणे...
अशीच विजिगुषु मानसिकता माझ्या ही देशाला  लाभो..
साक्षी- सिंधू सह अनेक  नवीन तयार होणाऱ्या  खेळाडूना मनापासून शुभेच्छा...

Monday, August 15, 2016

15 ऑगस्ट... एक चिंतन

काल  मित्राने  फोन केला होता... अज्या, काय  करतोस  चल  जाऊ  फोटो  काढायला.. मस्त  धबधब्याचे  फोटो  काढूयात.!!!  त्याचे  वाक्य  पूर्ण  होते  ना  होते  मला  अंगावर  क्षणभर  घामच फुटला त्याला  कारणही तसेच  होते.  मागील  महिन्यात  सलग  आलेल्या  सुट्ट्या  आणि  आजूबाजूला  झालेली  वाहनकोंडी मला  डोळ्यासमोर उभी राहिली. मी  भानावर  येत  माझा  नकार  कळवला.. पण कुठेतरी  माझे  मन  मला  खात  राहीले... लागून  येणाऱ्या  सुट्ट्या चा  आताशा  उबग  यायला  लागलाय. कुठे  तरी  मस्त  डोंगरावर  भटकंती  करावी  तर  प्रत्येक  ठीकाणी  ही  माणसांची  गर्दी  दृष्टीस पडते.  सह्याद्री  मधले धबधबे  हा  तर  एखादा  प्रबंधाचा  विषय  ठरावा  इतका  गरम  मुद्दा आहे. आज  स्वातंत्र्य मिळुन   सत्तर वर्षे  झालीत  पण  मानसिकता  आपली  दळभद्री  लक्षणे  सोडण्याच्या उपरांत कमालीची  बिघडलीय.  पंधरा  ऑगस्ट  काय... सव्वीस जानेवारी  काय  इतरही  सुट्टीच्या हंगामात सहकुटुंब बाहेर  जाणे  म्हणजे  गुन्हाच  ठरावा इतपत परीस्थिती नजरेस  पडते. "सेलिब्रेशन"  च्या नावाखाली  ओंघळ व बीभत्स पणा दिसायला लागलाय.  या दिवसात पुण्याच्या आजूबाजूला कुठेही  जायचे असेल तर वाहतूक कोंडीशी दोन  हात करण्याची तयारी ठेवूनच घराबाहेर पडावे  लागतेय. नवश्रीमंताचा वाढता ओघ आलेली  सुबत्ता आणि  बदललेली अभिरुची  हीच  हया  मानसिकतेला कारणीभूत  ठरतेय.  गेल्या  दोन  दिवसापासून  वाहतूक  कोंडीची चित्र वर्तमान पत्रात  छापून  येताहेत. ऊद्या एखादा अपघात  देखील  आपल्याला वर्तमान पत्रात  झालेला कळेल. नको ही सुट्टी असे काहीसे वाटावे  इतपत घडणाऱ्या  घटनाचा उबग आलाय. सोशल  मिडिया  मुळे  कुठलीही  ठिकाणे लगेच  प्रसिद्ध  होतात आणि मग  सुरू  होतो  त्या  ठिकाणाचा र्‍हासाचा खेळ.. आजूबाजूच्या राहणाऱ्या  लोकांना  होणारा त्रास.. नैसर्गिक  ठेव्याचे एका ओंघळ कचरापेटीत होणारे रूपांतर... सगळेच कमालीचे विषण्ण करणारे... इतकी वर्षे डोंगरात फिरतोय पण मागील काही  वर्षांतच  हे असले फालतू  सेलिब्रेशन फंडे सुरू  झालेत. आपल्या देशापेक्षा महाकाय परिघ व लोकसंख्या जास्त असलेल्या देशात पण हे असे  घडत नसावे किंबहुना हा मानसिकतेमधला फरक असावा.
थोडक्यात काय  तर पुढील काही वर्षांत कोणी  सहकुटुंब बाहेर फिरायला पडत असेल तर त्यांना  सही सलामत पर्यटन घडो  ह्या शुभेच्छा दिल्यास त्यात नवल वाटायला नको...

Sunday, August 7, 2016

नेमेचि येतो तांडा

आज सकाळी सकाळी  अचानक  मला  मेंढय़ाच्या  आवाजाने  जाग  आली. आम्ही  तिघे  खिडकीतून  डोकावून  बघतो  तर  काय   दोनकशे मेंढय़ा बॅ बॅ आवाज  करत  घरा  मागे  जमा  झालेल्या  कुठेतरी  पश्चिमात्य देशात  असल्याचा भास होत होता. पावसामुळे  सगळा  आसमंत कसा हिरवगार  झालेला त्यात  ह्या  किरमिजी  रंगाच्या  मेंढय़ा विशेष ऊठून दिसत  होत्या. दरवर्षी पावसाळ्यात  घरामागील  मोकळ्या  मैदानात  हा  पाल येत असतो. कधीकधी  पावसाची  झड लागून राहते मग  सुरू  होतो माझ्या मनात  विचारांचा  कालवा..
दोनेक  पुरूष  माणसे, बायका, चिल्ली पिल्ली, मेंढ्या आणि  सोबतीला  दोनेक घोडे असा  हा  सगळा जामानिमा स्थानापन्न होतो. टारपोलिन टाकून तात्पुरती  बनवलेली उघडीवाघडी झोपडी.  त्या जागेत कुठलीही ऐहिक  सुखे  नसताना ही मंडळी सुखेनैव राहतात. नळ सोडला की पाणी  हजर... सकाळी सकाळी  शौचालय  कुठे आहे  हा  प्रश्न बहुतेक त्यांना  पडत नसावा. खुल्या आभाळा खालीच आंघोळ  उरकली जाते  आणि मग  ह्या सर्व मेंढय़ाना घेऊन  चरावयास जाण्याची तयारी सुरू होते. चुलीवरचं आधण ढाणढाण पेटलेलं असतं आजुबाजुला  पोरं  काहीबाही  खात  नागडी  फिरत असतात. कोणाला कशाची  फिकीर  नसतेच  जणू. घोडे  पण कचराकुंडीत तोंड  खुपसून तो चिवडण्यात दंग झालेली असतात.  मेंढय़ा गेल्या की  परीसराची साफसफाई  झाडाच्या  छोट्या फांदीच्या मदतीने उरकली  जाते. लेंड्याचा हा ढीग दोनेक महीन्याच्या  वास्तव्यात  जमा होतो. पालावर कसाई  आले  की  त्याला  मेंढी  पसंत  पडे  पर्यंत  फिरवले  जाते. कळपातील  मेंढी  मागील  पाय धरून  उचलायची  आणि  तिच्या  वजनाचा  आदमास लावायचा  हा प्रकार  चालू  राहतो  व्यवहार  पक्का  झाला  की  कसाया कडून पैसे  घ्यायचे  हीच  पुढील  दिवसांची  ऊदरनिर्वाहाची  पुंजी.  मळकट  कपड्यात  फिरणारी  ही  लोकं  तुमच्या  आमच्या  पेक्षा  नक्कीच  जास्त  पैसे  बाळगुन असतात. कीती  कमी  गरजात राहणारी  ही  सगळी  मंडळी  बघितली  की  पांढरपेशा  समाजात  चाललेली  चढाओढ  बघून हसू  येतं. माणसाला  कीती  कमीत कमी  गरजात राहता येतं  हे  त्यांना  बघून  कळते.  डोक्यावर  छप्पर  नाही आज  इथे  राहुन  उद्या  दुसरीकडे  मुक्काम  असा  हा  पाल  वर्ष  वर्ष  फिरत  राहतो.  इतक्या  खडतर  जीवनात  ह्यांना  काय  आनंद  मिळत  असेल.  आपल्या  सारखे  जीवन  ही  माणसे  का  जगू शकत नाहीत. जीवन  ह्यांचे  खडतर  की  आपले?  या व इतर प्रश्नांची ऊत्तरे मी शोधत राहतो. 
माझ्या समोरच हा पाल एक दिवस  उठतो  आणि  पुढच्या  प्रवासाला चालू  पडतो मी मात्र  चार भिंतीच्या आत  बसून माझ्या मनात  चाललेल्या  कालव्याला  शांत करतो  बहुधा  पुढच्या  वर्षी  नक्कीच  मला ऊत्तर  सापडेल  असा  विचार करून  मी  परत चढाओढीत  सामील  होण्यासाठी सज्ज होतो....