Saturday, March 22, 2014

पुंजका विचारांचा

वेळ सकाळची. ऑफिसला जायची सर्वाना घाई, साधारण ९ वाजता. स्थळ- सिंहगड रोड... ट्राफिक अडकत अडकत पुढे सरकतंय, उन्ह तापायला लागली आहेत आणि सूर्य आपले काम चोख बजावतोय. मनातले विचार....

च्यायला वैताग आलाय ह्या ट्राफिक चा ssss
हा सिग्नल किती वेळ घेतोय पुढच्या वर्षी ग्रीन होणार कि काय sss 
आयला activa वाली  मस्त ड्रेस घातलाय..
ओ भाऊ, जरा गाडी बाजूला ठेवा नवीन गाडी आहे माझी, घासेल ना sss 
कोणास ठावूक पुण्यात एवढी माणसे कुठून आली आहेत तडमडायला..
नुसत्या टू व्हीलर आहेत राव..
ह्या रोड वर फ्लाय ओवर कधी होणार कोणास माहित...
हे राजकारणी * * घाले आहेत..
सिंहगड रोड ची वाट लावली पार..
धूळ,धूर,घाण,प्रदूषण  वाटते परदेशी राहावे. (मनात हसू) 
कसली sss बिलगून बसलीये राव...( मनात कालवा कालव)
अजून किती दिवस हे अस चालणार काय माहित..
गाडी मस्त ठेवलीये साल्याने.. एकदम चकाचक..
हा पोलिस माझ्या कडे तर येणार नाही ना..
साला, कधी BMW येणार अशी आमच्या आयुष्यात..
काय, खड्डे आहेत यार रोड वर...
नदीकाठचा रस्ता मोकळा असेल तर गाडी जाम बुन्गवता येते ..
कसलं खतरनाक मॉडेल आहे गाडीचे...


हे आणि इतर बरेच विचार मनात येत असतात आपण आणि आपली बाईक हे चालत राहतात. ह्या सर्व विचारात ऑफिस कधी येते हेच कळत नाही. दिवसभर तिथेच थांबायचे असते काही काम नसले तरी...आणि असले तरी..









Saturday, March 15, 2014

माझे खाद्यायन

परवा एका हॉटेल मध्ये जायचा योग आला, खूप दिवसाने मसाला डोसा खायची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. आमच्या बाजूच्या टेबलवर एक मध्यम वयीन फिरंग बाई येउन बसली होती मी खात खात तिचे निरीक्षण करत होतो.खरतर इतकी वर्ष ह्या फिरंग लोकांना बघत आलो आहे ह्या लोकांची ढबच न्यारी असते काही म्हणा ! सांगायचा मुद्दा हा कि, ती पण सावकाश तिच्या डोस्याचा आस्वाद घेत होती. इकडे मी बचक बचक खात होतो भुकेने मला काही सुचत नव्हते आणि हि बया एकदम सावकाश एक एक घास खाऊन चावून चावून रवंथ करीत खात होती. लहान पणा पासून आपण सर्व जण इंग्रजी सिनेमे पाहत आलो आहे पण मला जेव्हा जेव्हा पदद्यावर खायचा सीन दिसायचा आणि हि लोक खाताना दिसायची तेव्हा एकच प्रश्न पडायचा कि हे लोक कमी बोलत कसे खाऊ शकतात आणि आपल्याला का जमत नाही. सिनेमा संपून बाहेर येताना मी संकल्प केलेला असायचा कि मी पण ह्याच पद्धतीने खाणार आणि पुढच्या काही दिवसात माझा हा संकल्प मोडकळीस आलेला असायचा.

सांगायचा मुद्दा हा कि, हि मस्त त्या पदार्थाचा आस्वाद घेत खात होती सोबतीला तिने लायिंम जूस हि मागवला होता मग काय पाहता, तिचे सर्व तब्येतीत चालले होते आणि इकडे मी बायकोच्या शिव्या खात होतो कारण माझे सांभार चमच्या मधून टेबलवर पडून माझ्या तोंडात पोहचत होते.
फिरंग लोका कडून काही नाही तरी त्या दिवशी मी सबुरीने खायचे कसे ह्याचे प्रात्यक्षिक जणू काही शिकून गेलो. आणि नेहमीप्रमणे हॉटेल मधून संकल्प करून बाहेर पडलो कि मी पण चवी चवी ने पदार्थ खाणार.

Monday, March 10, 2014

अज्ञान (?)

काही दिवसा पूर्वी आमच्या सोसायटी मध्ये पाण्याच्या पंपाचे काम चालू होते आणि मी नकळत माझ्या लहानपणीच्या आठवणी मध्ये रमलो. आमचे काकांचे शेत वडकी नाल्याला होते आणि आम्ही शाळेत असताना रविवारी किवा सुट्टी च्या दिवशी त्यांच्या बरोबर कल्ला करायला जात असू. शेतावर आणि बांधावर फिरताना खरच खूप मज यायची. तसे आमचे काम काही नसायचे पण जीप मधून जायला मिळतेय आणि ते हि शेतावर मग काय आम्ही एका पायावर तयार असायचो. १३ एकरात पसरलेलं विस्तीर्ण शेत. गाडी लावायचो तिथे जाई बाईचे  घर आणि विहीर होती तिचे पाणी हि तेवढेच गोड होते. तिथे गेल्यावर थकवा असा जाणवायचा नाहीच. मनसोक्त हुंदडणे हा आमचा क्रम असायचा. किसन बैल घेऊन आला कि त्यांच्या मागे काठी घेऊन जायचे. कुळवणी कशी करतात ह्याचे बिनतोड प्रात्यक्षिक आम्हाला दिसायचे,गोफण फिरवून पाखर उडवणे म्हणजे काय असते हे केल्याशिवाय कळणार नाही. हुरडा पार्टी, मटन पार्टी  हाय ज्या काय झ्याक काट्यागिरी मध्ये मोडणाऱ्या पार्ट्या आहेत त्या आम्ही लहानपणीच झोडल्या. एकेदिवशी काकांबरोबर एका नवीन विहिरीचे काम बघायला जायची संधी मिळाली. शनवार पेठेतून कासम भाई कडून सुरुंगाची दारू आणून ति विहिरीत काम करत असलेल्या कामगारा पर्यंत आम्ही पोचवायचो. पहारीने केलेल्या खोल खड्यात ति दारू भरून वात पेटवली कि लांब लांब पळायचे आणि एकच आवाज होऊन सर्व दगडाच्या ठिकर्या हवेत भिरकावल्या जायच्या स्वताला वाचवत आम्ही जीव घेऊन पळायचो पण परत येउन बघितले कि मोठा खड्डा झालेला दिसायचा आणि मग परत पुढील काम सुरु व्हायचे.त्याकाळी किती माणसे उपलब्ध असायची आणि ३-४ महिन्या मध्ये विहीर बांधून तयार पण व्हायची आज सारखे यंत्रवत तेव्हा काहीच नव्हते.

हे सर्व विचार इतक्या झर्रकन माझ्या मनात येउन गेले आणि मी गुरुजींनी टाकीवर फोडायला घेतलेला नारळ बघून भानावर आलो आणि एक अतिशय बालिश आणि जुनाट प्रश्न मी प्लंबर ला विचारला " अहो, पण इथे टाकीला पाणी चढवायला मोटर कुठाय? त्याने चमकून माझ्याकडे बघितले आणि "काय येडय" म्हणून मला सांगितले कि " साहेब आजकाल मोटारी पण पाण्यात बुडवून ठेवणाऱ्या मिळतात त्यांना बाहेर ठेवायची  गरज लागत नाही" मी चाटच झालो आणि खरोखरच माझ्या अज्ञानाची मला कीव आली आणि तंत्रज्ञान किती पुढारलेले आहे ह्याची प्रचीती... मनोमन मी हात जोडले आणि फक्त पुटपुटलो कालाय तस्मे नमः....

Saturday, March 8, 2014

वेडा राघू...

आज खूप दिवसांनी लिहावेसे वाटले आणि कारणे शोधू लागलो. डोक्यात विचाराचा भुंगा चालूच. काय लिहावे आणि कसे लिहावे ह्याच गोष्टीने मन कातावले होते.आणि मला कारण सापडले... गेल्या दोन तीन दिवसापासून मी जर वेड गळा सारखा वागतोय आसे माझे मलाच जाणवले. बायको ने पण मला विचारले कि कुठे आहेस म्हणून पण माझ्याकडे उत्तरच नव्हते. साध्या साध्या गोष्टीत चुका होत आहेत आणि मी त्या सुधारू शकत नाही. माझे मलाच हसायला येत होते. खूप काही गंभीर नाही पण माझे वागणे मलाच नवीन आहे आणि त्यावर मलाच तोडगा शोधयला  हवाय.आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी पण खूप काही शिकवून जातायत पण बहुदा माझेच शिकायचे मन नाहीये.इतक्या वर्षात मी असा नवीन अनुभव पहिल्यांदा घेतोय. खरतर मनाचा ठोका एकवेळ चुकतो कि हे असच तर चालू नाही न राहणार कि मीच कुठल्या तरी तंद्री मध्ये आहे आणि जग मला बघून हसतंय असा काहीसं मनात दाटून येतंय. बहुदा मनाची अशी घालमेल सर्वांनी कधी न कधी अनुभवली असेल किवा ज्यांची वय झालेली आहेत त्यांनी कदाचित हा अनुभव घेतला हि असेल.खूप काही विचार केला तर हाताला काहीच सापडत नाही आणि मग नुसता हात चोळत बसने हाच एक पर्याय उरतो.बहुदा मीच माझ्या ह्या मनाच्या खेळांकरिता कारणीभूत आहे. उगाच नको ते विचार मनात आणून आजचा माझा दिवस आणि वेळ मीच तर नाही ना वाया घालवत...हे हि कारण असू शकते.

पण खर सांगू का.. माझ्या ह्या मनाच्या खेळांची पण मी मजा घेतोय कारण माझ्यातलाच "मी" शोधायचा प्रयत्न करतोय.मनाचे हे खेळ खरतर सर्वांनी अनुभवले असतील हि कदाचित, दरवेळी आपल्या हाताला काय लागले ह्या पेक्षा जे हाताला लागेल ते लागेल पण ह्या मनाच्या खेळाची मजा तर अनुभवू यात
... 

Thursday, May 23, 2013

मित्रानो, लाकूडतोड्याची गोष्ट आपण सर्वांनी लहानपणी वाचली आणि ऐकली असेल पण मला सुचल्या प्रमाणे मी हि लाकूडतोड्याची गोष्ट माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. मला आशा आहे कि तुम्हाला हि सर्वाना माझी गोष्ट आवडेल फक्त एक करा या गोष्टीला नाव सुचवा आणि गोष्टीचे तात्पर्य काय असू शकते हे सांगायला आपल्या कॉमेंट मध्ये विसरू नका.

एका नगरात कोंडीबा नावाचा लाकुडतोड्या आपल्या कुटुंबीया समवेत राहत होता. रोज जंगलात जाऊन लाकूड फाटा तोडून आणणे आणि तो नगरच्या बाजारात जाऊन विकणे असा त्याचा दिनक्रम. विमला हि त्याची बायको तोज त्याला शिदोरी बांधून देत असे. गणेश आणि विनेश हि त्याची दोन मुलेही त्याला लाकूड फाटा आणन्या च्या कामात मदत करत असत. कोंडीबा चा मित्र सखाराम हा देखील अधून मधून त्याच्या कडे येत जात असे जो गावातला एक बलुतेदार होता. कोंडीबाचे आपल्या कुटुंबावर निरतिशय प्रेम होते. अतिशय प्रामाणिक  असा हा लाकुडतोड्या संपूर्ण नगरात सर्व जनतेला माहित होता. कारण त्याच्या लाकूड फाट्या शिवाय लोकांच्या चुली पेटत नसत आणि आंघोळीला गरम पाणीही मिळत नसे. कुणाचेही देणी नसलेला असा हा कोंडीबा आपले आयुष्य आणि दिवस नित्य क्रमाने जगत होता. एकेदिवशी विमला कडून त्याने शिदोरी बांधून घेतली आणि  लाकूड फाटा  आणण्या करिता हा जवळच असलेल्या ''पाचनयी'' च्या जंगलात गेला. अतिशय रम्य असे हे जंगल जवळच असलेला सुंदर तलाव आणि घनदाट झाडी करिता सुप्रसिद्ध होते. आजचा दिवस पण कोंडीबा करिता रोजच्या सारखाच होता. एक मोठे झाड बघून त्याने लाकूड तोडायला सुरवात केली. त्याची आवडती कुऱ्हाड सपासप लाकूड कापत असताना त्याचे लक्ष विचलित होऊन त्याच कुर्हाडीचा घाव पायाच्या बोटावर बसला कोंडीबा कळवळला आणि इतक्यात त्याची आवडती कुऱ्हाड त्या पाण्यात पडली. काय करावे ते कोंडीबा ला सुचेनासे झाले. अत्यंत उद्विग्न आणि दुखी होऊन तो मटकन खालीच बसला त्याला पुढे काय होणार ह्या विचाराने रडू कोसळले. कारण त्याची आवडती कुऱ्हाड पाण्यात पडली होती. देवावर विश्वास असलेला कोंडीबा आपल्या नशिबाला दोष देत तिथून निघून जायला निघाला इतक्यात त्याला मागून आवाज आला.
कोंडीबा ssss कोंडीबा ssss
कोंडीबा- कोण --- कोण--
जलदेवी- मी जलदेवी...
कोंडीबा- आ ... तू आणि ह्या जंगलात
जलदेवी- होय कोंडीबा, तुझे कष्ट आणि मेहनत मी जाणते काय झालंय तुला दुखी व्हायला?
कोंडीबा- माझी आवडती कुऱ्हाड ह्या पाण्यात पडली आहे आणि मी लाकूड फाटा नाही नेला आणि तो नगरातल्या बाजारात नाही विकला तर खाऊ काय? बायको आणि मुलांना सांगू काय?
जलदेवी- थांब कोंडीबा. मी आणते तुझी कुऱ्हाड.
असे म्हणून जलदेवी पाण्यात जाऊन एक चकाकणारी सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. जलदेवी ने कोंडीबा ला विचारले.
"हीच का तुझी कुऱ्हाड"
कोंडीबा ने " नाही" असे उत्तर दिले.
अशीच तीन डुबक्या मारून जलदेवी ने त्याला अनुक्रमे चांदी, आणि हिर्याची पण कुऱ्हाड दाखवली पण कोंडीबा चे उत्तर "नाही" असेच होते. पण जेव्हा जलदेवी ने त्याची आवडती कुऱ्हाड दाखवली तेव्हा कोंडीबा खुशीने नाचायला लागला आणि हीच ती माझी आवडती कुऱ्हाड म्हणाला. जलदेवी त्याच्या प्रामाणिक पणावर खुश होऊन म्हणाली " कोंडीबा... आजकालच्या जगात इतका प्रामाणिक पणा दुर्मिळ झालाय मी तुझ्यावर प्रसन्न आहे". जल देवीने सोन्याची, चांदीची आणि हिर्याची कुऱ्हाड पण कोन्दिबाला देऊ केली. अतिशय खुश होऊन कोंडीबा घराकडे निघाला. घरी आल्यावर त्याने घडलेली हकीकत विमला ला सांगितली. दोघांनी पूर्ण विचारा अंती नगर सोडण्याचा निर्णय घेतला आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहायचे ठरवले. त्यांनी सखारामला हि बरोबर घ्यायचे ठरवले. तालुक्याच्या ठिकाणी कोंडीबाने  त्या कुर्हाडी विकून मोठी वखार विकत घेतली आणि कोंडीबा चा कोंडीबाशेट म्हणून तालुक्याला तो सुप्रसिध्द व्यापारी झाला. सखाराम त्याच्या कडेच व्यवस्थापक म्हणून कामं करू लागला. आणि सर्वजण आपले पुढील आयुष्य सुखाने जगू लागले.

Saturday, October 15, 2011

आली दिवाळी...


लहानपणा पासून सर्वाना दिवाळी ह्या सणाचे फार मोठे कौतुक असते. कधी हा सण येतो आणि मजा करायला मिळते असे ह्या सणाच्या निमित्ताने होऊन जाते. साधारण वीसेक वर्षापूर्वी पुण्यात वाडे संस्कृती असल्यामुळे ह्या सणाची मजा सर्वजण एकत्र येऊन घेत असत. परीक्षा संपल्या कि सर्व बच्चे कंपनी ला किल्ले करायचे वेध लागायचे.आम्ही सर्व लहान मुले माती कुठे मिळते ह्याचा शोध घेत फिरायचो आणि ती चाळून आणणे हा मोठा उद्योग असायचा.हे सर्व करण्या मध्ये वेळ कसा मजेत निघून जायचा.गल्ली मध्ये फिरताना घरा घरा मधून येणारे फराळाच्या पदार्थाचे सुगंध तर वेड लावत असत. कधी एकदा हा सण येतो असे होऊन जायचे. आम्हा मुला मध्ये तर कोणाचा किल्ला भारी ह्या गोष्टीवरून पैज लागायची आणि सर्व जण एकमेकांच्या घरी जाऊन किल्ले बघत असू. मित्रांच्या आया आम्हाला फराळाला आवर्जून बोलवत असत आणि आम्ही देखील मजेत त्यांच्या कडे जाऊन फराळावर आडवा हात मारत असू. दिवाळीच्या पहिल्यादिवशी तर धमाल असायची अभ्यंगस्नान करायच्या आधी गल्लीत जाऊन एखादा चुकार मुलगा मोठा आटोम बॉम्ब लावायचा आणि सर्व गल्ली कशी जागी होईल हेच पहायचा. ओट्यावर झोपलेल्या लोकाजवळ तर हटकून हे असले प्रकार व्हायचे आणि सकाळी सकाळी बोंबाबोंब सुरु व्हायची मग आम्हाला सकाळी उजाडल्यावर विषय मिळत असे. फटके फोडण्यावरून तर किती वाद व्हायचे ह्याला काय सुमार नसायचा. जागा मिळेल तिकडे फटाके फोडले जायचे आणि लोक बोंब मारत घराबाहेर यायचे.नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन,पाडवा हे सर्व सण दणक्यात साजरे व्हायचे. आकाश कंदील घरी बनवणे ह्या सारखा आनंद नाही आणि आम्ही तो मनसोक्त उपभोगला आहे.
काल परवा मी मार्केट मध्ये खरेदी करायला गेलो होतो म्हटले दिवाळीची खरेदी करावी तर सर्व संदर्भ बदलल्या सारखे वाटले खूप सपकपणा जाणवला लोकांचा उत्साह होता पण त्यात कुठेतरी सर्व जण आपल्या परीने लहान पणी दिवाळी कशी साजरी करायचो आणि आता किती तरी बदल त्यात आला आहे हाच विचार करत खरेदी करत आहे असे वाटत होता. लहान मुलांचे किल्ले हे आता रेडीमेड मिळतात हे बघून तर हसावे कि रडावे हेच कळेना. आणि मंडळी ते पण मजेत खरेदी करत होती असो.
दिवाळी सणात दिव्यांची आणि पणत्यांची जी काही खुमारी असते ती लाजवाब म्हणयला हवी.

Friday, June 3, 2011

निसर्गपान....!!!!!!

फिरण्याची आवड कोणाला नसते जो तो आपल्या परीने आजूबाजूचा परिसर धुंडाळत असतोच कि. माझे हि तसेच काहीसे झाले हि गोष्ट आहे आठेक वर्ष पूर्वीची मी काम करत असलेल्या समूहा मार्फत आम्हला भारत भर फिरण्याची जणू संधी मिळाली आणि तिचा पुरेपूर फायदा घेत आम्ही आमचे अनुभवाचे विश्व संपन्न केले आणि खूप दिवसापासून ची माझी जी इच्छा होती कि, एखादा लांबचा प्रवास करायला मिळावा आणि तो हि पूर्ण पणे साहसी असावा... ती संधी चालून आली २००३ च्या ऑक्टोबर महिन्यात त्याला कारण हि तसेच होते पुणे ते सिक्कीम असा रोमांच कारक प्रवास आम्हा पाच जणांना क्वालीस या वाहनातून करायचा होता. नकाशा बघण्यापासून मार्गामध्ये येणाऱ्या निरनिराळ्या अडथळ्यांचा  अभ्यास केल्यावर असे लक्षात आले कि हा संपूर्ण प्रवास ५-६ राज्यामधून होणार आहे. निघायच्या दिवसापर्यंत सर्व जामानिमा जमवत आम्ही एकदाचे मार्गस्थ झालो. गाडी मध्ये ५ लोक होतो त्यात मी,राजा (ड्रायवर),पिंट्या,मोहन (कुक)चिन्या(वाटाड्या) अशी विभागणी झाली.टप्प्या टप्प्यात हा प्रवास करायचा असा दंडक आम्हला घालून दिला होता पण राजा ने दिवसभर गाडी चालवायची आणि रात्री मी बसायचे असे ठरले नगर, अमरावती, नागपूर, भंडारा,राजनांदगाव,रायपुर,दुर्ग,भिलाई,संबलपुर असे करत आम्ही केओन्झार कधी मागे टाकले ते कळले नाही. दुसरा दिवस उजाडून दुपार झाली आणि दिवस मावळतीला लागला तेव्हा सर्व जण निद्रा देवीची आराधना करू लागले.देवगड नावाच्या छोट्या गावात एक चांगलासा लॉज बघून आम्ही तिथे झोपायचा निर्णय घेतला. सकाळी उठल्यावर परत आमचा प्रवास सुरु झाला. अतिशय सुंदर घाट रस्त्यावरून आम्ही आमची मार्गक्रमणा करत होतो पण रस्ता अतिशय खराब आणि खड्डया नि भरलेला होता.मनात एक काळजी होती , जर का गाडी कुठे पंक्चर झाली तर काही खैर नव्हती. हा सर्व परिसर ओरिसा ह्या राज्याचा होता दुपारी आम्ही झारखंड सोडून परत ओरिसा मध्ये प्रवेश करते झालो. रस्त्यामध्ये जाताना ह्या राज्यात असलेले मागासलेपण लक्ष वेधून घेत होते आणि मनोमन आपण खूप सुखी असल्याचा अभिमान वाटत होता. संध्याकाळी आम्ही खरगपूर सोडून मिदनीपूर मार्गे कोलकाता ह्या पश्चिम बंगालच्या राजधानी मध्ये प्रवेश केला. हुगळी नदीवरील भलामोठा हावडा ब्रिज मावळतीच्या सुर्यकिरणानी  न्हाऊन निघाला होता आणि क्षितिजावर अंधार आणि उजेडाचा खेळ चालू असताना ब्रिज वरील मिणमिणते दिवे सुंदर दिसत होते.जवळ प्रसिद्ध असे इडन गार्डन हे क्रिकेटचे मैदान देखील दिमाखात उभे होते. आम्ही तसेच पुढे जाऊन विमानतळा जवळील एका हॉटेल मध्ये पेटपूजा करून पुढील प्रवासाकरिता मार्गस्थ झालो. रात्रीचा प्रहर आणि अनोळखी प्रदेशामधून प्रवास करताना एका अनामिक भीतीचे सावट जसे असते तसे आपले शेवटचे स्थान गाठण्याकरिता चाललेला प्रवास हि तेवढाच मजेशीर असतो. मध्यरात्री कधीतरी किशनगंज सोडल्यावर पहाटे आम्ही "फराक्का" नावाच्या एका छोट्या गावातून जात होतो. बंगाल च्या सागराला मिळालेले एक पाण्याचे टोक आणि त्यावर बांधलेला २-३ किमी चा लांबलचक ब्रिज पाहून नतमस्तक झालो आणि भीतीने पोटात उठलेला गोळा हि अनुभवला. सकाळी कधी तरी मालदा ह्या शहरातून बाहेर पडून सुसाट वेगाने आम्ही आमच्या शेवटच्या टप्प्या कडे जात होतो आणि बरोबर सकाळी ११ वाजता आम्ही "सिलीगुडी" ह्या शहरामध्ये पोहोचलो.अडीच दिवस अव्याहत पणे आमची गाडी चालू होती आणि मुक्काम न करता आम्ही इथे पोहचलो होतो.दमलो असल्याने आम्ही झोपून संध्याकाळी बाहेर पडलो. काही जुजबी खरेदी करून आम्ही सकाळी परत पुढील प्रवासाकरिता रवाना झालो. सिलीगुडी-सिवोक-आडवा नाला-मेल्लीबाझार-तिस्ता-आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीम च्या वेशीवर असलेल्या "रांगपो" ह्या गावात पोहोचलो.गावाच्या अलीकडेच असलेल्या एका ठिकाणी आमचा कॅम्प असणार होता. बाजूला तिस्ता नदीचा साथ,खळाळत आणि अव्याहत वाहणारे ते पांढरे शुभ्र पाणी बघून मनाचा थकवा पार पळून गेला. अतिशय शांत आणि सुंदर निसर्ग लाभलेला हा परिसर मानसिक आनंद देऊन गेला.  टाटा  मोटर्स  ह्या  कंपनी  करिता  आम्ही  सलग  चार  समूह बंधनाचे  प्रोग्राम  करणार  होतो. भारताचे  ईशान्य  टोक  जवळ  असल्याने  सकाळ  लवकर  व्हायची  आणि  दिवस  पाच  ला मावळायचा. रात्री  तंबूत  लावलेले  कंदील हेच  आमचे  जवळचे  वाटायचे. तीस्ता नदीचा  अखंड  खळाळता  प्रवाह साथीला  असायचा. जंगल  कॅम्प  असल्याने  आम्हाला  रात्री  सजग  रहावे  लागायचे. इथल्या  लोकांचे  वैशिष्टय़  म्हणजे  चिवट  शरीर  यष्टी  आणि  कामाला असलेली  तत्परता. बहुसंख्य  महीला ह्या  घरातील  आर्थिक  जबाबदारी  उचलताना दिसतात  क्वचितच  पुरूष  काम करताना आढळतात. दिवसभर  दारू  ढोसण्यात ही  मंडळी  धन्यता  मानतात. निसर्गाची  मुक्त  हस्ते  होणारी  ऊधळण ह्या  राज्यात  बघायला  मिळते. तद्वत डोंगराळ  भाग  असल्याने कष्टप्रद  जीवन  इथल्या  नागरिकांच्या अंगवळणी  पडले आहे.
विखुरलेली  आणि  तितकीच  सुबक  घरे  बघून  गंमत  वाटते. चपट्या  नाकाची  शेंबडी  पोरं  सुखनैव  बागडताना  दिसतात. डोंगरात  असलेल्या  शाळा  बघून  आपल्या  कडील  विद्यार्थ्याची  मनात नकळत  तुलना  होते. निसर्ग  हाच  खरा  गुरू  हे  तिथे  गेल्या शिवाय  कसे  कळणार....

निसर्गाच्या कुशीत काढलेले ते २३ दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर निसर्गपान म्हणून मी जपून ठेवले आहे. सुंदर आणि अनुभवाने खचाखच भरलेले ते दिवस विसरू म्हणता विसरता येत नाहीत आणि जेव्हा केव्हा मनात विचारांची गर्दी दाटून येते आणि निराशेचे ढग जमू लागतात तेव्हा मी हा प्रवास आठवून माझी पुढची मार्गक्रमणा करतो.